नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानबाबत आणखी एक कठोर भूमिका घेतली आहे. इस्लामाबादमध्ये आयोजित सार्क परिषदेला भारत हजेरी लावणार नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयातर्फे देण्यात आली आहे.


येत्या नोव्हेंबर महिन्यात पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये सार्क देशांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. मात्र भारताने या परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर कठोर पावलं उचलल्याचं पाहायला मिळत आहे.

एका देशाने परिषदेसाठी प्रतिकूल वातावरण निर्माण केलं आहे, असं भारतातर्फे सार्कच्या अध्यक्षांना सांगण्यात आलं आहे. भारतासोबतच अफगाणिस्तान, बांगलादेश आणि भूतान हे देशही सार्क परिषदेला गैरहजेरी लावण्याची शक्यता आहे.

https://twitter.com/MEAIndia/status/780795178592247808

सहकार्य आणि शेजारी देशांशी चांगले संबंध ठेवण्याबाबत भारत प्रयत्नशील राहील, मात्र दहशतीच्या वातावरणात असे संबंध अबाधित राखले जाऊ शकत नाहीत, असं स्पष्ट मत भारताने मांडलं आहे.

सिंधु नदीच्या पाणीवाटप करारावरुन आधीच भारताने कठोर भूमिका घेतली आहे. ‘रक्त और पानी साथ साथ नही बह सकते’, असे उद्गार मोदींनी काढले होते. त्यानंतर सोमवारी संयुक्त राष्ट्रसंघांच्या आमसभेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीही पाकिस्तानला चांगलंच खडसावलं होतं.

संबंधित बातम्या :


काश्मीर बळकावण्याचं स्वप्न पाहू नका, स्वराज यांनी पाकला खडसावलं


खून और पानी एक साथ नही बह सकता, पंतप्रधानांची कडक भूमिका