Covid-19 New Cases : शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या वृत्तानुसार, मागील 24 तासांत देशात 8 हजार 318 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 465 जणांचा मृत्यू झालाय. याच कालावधीत 10 हजार 967 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 3 कोटी 39 लाख 88 हजार 797 इतकी झाली आहे. देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एक लाख 7 हजार 19 इतकी झाली आहे. शुक्रवारी देशात कोरोनाचे 10 हजार 549 नवे रुग्ण आढळले होते. शनिवारी या रुग्णसंख्येत घट पाहायला मिळाली.
 
कोरोनामुळे देशात आतापर्यंत एकूण 4 लाख 67 हजार 933 लोकांचा मृत्यू झालाय. देशात आतापर्यंत 121.06 कोटी जणांनी कोरोनाची लस घेतली आहे.  देशातील कोरोना रुग्णाचा रिकव्हरी 98.34% इतका झालाय. देशाचा पॉझिटिव्हिटी रेटही घसरलाय. देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट  0.86% इतका झालाय. मागील 54 दिवसांपासून दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे.  आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट 13 दिवसांपासून एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. देशाचा आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट 0.88 टक्के इतका झालाय.

  







महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती : 
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 852 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, 34 जणांचा उपचारदरम्यान मृत्यू झालाय. याशिवाय, 665 रुग्णांनी आज कोरोनावर मात केलीय. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याची प्रमाण 97.7 टक्के इतके झाले आहे. महाराष्ट्रात आलेली कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यात प्रशासनाला मोठं यश आलंय. राज्यातील रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. त्यामुळं हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असून, नागरिक कामानिमित्ताने घराबाहेर पडू लागले आहेत. राज्यात गेल्या 24 तासात 852 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आलीय. तर, कोरोनामुळं 32 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 33 लाख 32 हजार 723 वर पोहचली आहे. राज्यात आज 665 रुग्ण कोरोनामुक्त झाले. ज्यामुळं राज्यातील कोरोनामुक्तांच्या संख्यानं 64 लाख 80 हजार 61 चा टप्पा गाठलाय. राज्यातील मृत्युदर 2.12 टक्के एवढा झालाय.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलवली बैठक -
दक्षिण आफ्रिकेतल्या कोरोनाच्या नव्या विषाणूचं भय वाढत चाललेलं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाची  बैठक बोलवली आहे. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता दिल्लीत उच्चस्तरीय बैठक होणार आहे. डेल्टापेक्षाही जास्त भयंकर हा विषाणू मानला जात असल्याने तातडीने उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.