नवी दिल्ली: आर्थिक वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाहीमध्ये (जानेवारी ते मार्च) देशाच्या जीडीपीचा वेग (GDP Growth Rate) घसरल्याचं समोर आलं आहे. चौथ्या तिमाहीत देशाचा जीडीपी हा 4.1 टक्के इतका नोंद करण्यात आला आहे. त्याच आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत हाच दर 5.4 टक्के इतका होता. 2021-22 या वर्षाचा वार्षिक जीडीपी हा 8.7 टक्के इतका आहे. महागाई वाढल्याच्या फटका हा देशाच्या जीडीपीच्या वेगावर झाला असल्याचं स्पष्ट झालं आहे.
नॅशनल स्टॅटेस्टिकल सर्व्हेने (NSO) जीडीपीची आकडेवारी जाहीर केली आहे. एनएसओने दिलेल्या आकडेवारीनुसार, चौथ्या तिमाहीनंतर देशाच्या जीडीपीमध्ये 40.78 लाख कोटी रुपयांची भर पडली आहे. देशाचा एकूण जीडीपी हा 8.7 टक्के वेगाने वाढला असून तो अंदाजित 8.9 टक्के पेक्षा कमी आहे. कोरोनाची तिसरी लाट आणि जागतिक स्तरावर वाढलेल्या महागाईचा फटका भारताच्या विकासदराला बसला आहे.
विकासदरामध्ये घसरण
गेल्या आर्थिक वर्षामध्ये तिसऱ्या तिमाहीमध्ये म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर 2021 मध्ये आर्थिक विकास दर हा 5.4 टक्के इतका होता. त्याच्या तुलनेमध्ये चौथ्या तिमाहीत मोठी घट झाली आहे.
औद्योगिक विकासदरामध्ये वाढ
केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील उद्योग क्षेत्राचा विकासदर हा 8.4 टक्के इतका आहे. एप्रिल 2022 मध्ये कोळसा, वीज, रिफायनरी उत्पादन, सीमेंट, प्राकृतिक गॅस उद्योगांचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढलं आहे. त्याचा परिणाम उद्योग क्षेत्राच्या विकासदरावर झाला आहे.
राजकोषीय तूट कमी
आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये राजकोषीय तूट (Fiscal Deficit) ही 6.7 टक्के इतकी राहीली आहे. ती 6.9 टक्के इतकी अदाजित होती. 2021-22 वर्षासाठी राजकोषीय तूट ही 15.87 लाख कोटी इतकी आहे.
जानेवारी ते मार्च महिन्याच्या दरम्यान कोरोना महासाथ, रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेले युद्ध याच्या परिणामी महागाईमध्ये वाढ झाली होती. त्याचा परिणाम देशाच्या विकास दरावर झाला आहे.