India Coronavirus Updates : भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. काल दिवसभरात जगातील सर्व दैशांपैकी सर्वाधिक कोरोनाबाधित भारतात आढळून आले आहेत. सोमवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 42,909 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तसेच 380 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. अशातच गेल्या 24 तासांत 34,763 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 


वर्ल्डोमीटर वेबसाईटनं दिलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात भारतात सर्वाधित कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. अमेरकेत 37262, ब्रिटनमध्ये 33196, इराणमध्ये 31516, जपानमध्ये 22748 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, रशिया, मेक्सिको, इराण, इंडोनेशियात भारताहून कमी रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


भारतातील कोरोनाची एकूण आकडेवारी


कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 27 लाख 37 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 38 हजार 210 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, 3 कोटी 19 लाख 23 हजार रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या तीन लाखांहून अधिक आहे. एकूण 3 लाख 76 हजार रुग्ण अद्यापही कोरोनावर उपचार घेत आहेत. 


कोरोनाची एकूण आकडेवारी : तीन कोटी 27 लाख 37 हजार 939
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 19 लाख 23 हजार 405
सक्रिय रुग्णांची एकूण आकडेवारी : तीन लाख 76 हजार 324
एकूण मृत्यू : चार लाख 38 हजार 210
एकूण लसीकरण : 63 कोटी 43 लाख 81 हजार लसीचे डोस


महाराष्ट्रात काल (सोमवार) 4,666 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


राज्यात काल (सोमवार) 4,666 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 510 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 63 हजार 416 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के आहे. 


राज्यात काल (सोमवार) 131 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. तब्बल 42 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 52 हजार 844 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 13,503 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (48), नंदूरबार (2),  धुळे (20), जालना (33), परभणी (36), हिंगोली (59),  नांदेड (32),  अकोला (23), वाशिम (6),  बुलढाणा (50), यवतमाळ (7), नागपूर (74),  वर्धा (5), भंडारा (8), गोंदिया (4),  गडचिरोली (32) या 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. 


जालना, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया या पाच जिल्ह्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 36,59,613 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,56,939 (12.03 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,91,522 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,315  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


मुंबईत गेल्या 24 तासात 345 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 


मुंबईत गेल्या 24 तासात 345 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 280 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,22,039 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 3036 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1611 दिवसांवर गेला आहे.