Corona Update News : भारतामध्ये पुन्हा एकदा कोरोना महामारीने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. मुंबई, दिल्लीसह मेट्रो शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रविवार महाराष्ट्रात जवळपास तीन हजार नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर मुंबईत 761 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. ओमायक्रॉन (Omicron) चा सब-व्हेरियंट BA.4 चा एक रुग्णही मुंबईत आढळला आहे. देशाची राजधानी नवी दिल्लीमध्येही कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नाही. नवी दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येबरोबरच मृताची संख्याही वाढत आहे.  


राजधानी नवी दिल्लीमध्ये फेब्रुवारी ते जूनदरम्यान कोरोनामुळे 157 जणांचा मृत्यू झालाय. दिल्लीमधील कोरोना महामारी संपण्याचं नाव घेत नाही. यंदा राजधानी दिल्लीमध्ये कोरोना संख्यामध्ये चढउतार पाहायला मिळाला. मागील सहा महिन्यात जूनमध्ये दिल्लीमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. राजधानी नवी दिल्लीमध्ये फेब्रुवारी ते जूनदरम्यान 157 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. दिल्लीच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जून महिन्यात 57 जणांचा मृत्यू झालाय. मागील पाच महिन्यात ही सर्वात जास्त संख्या आहे. 


कोणत्या महिन्यात किती मृत्यू ?
फेब्रुवारी - 23 जणांचा मृत्यू
मार्च - 26 जणांचा मृत्यू
एप्रिल - 22 जणांचा मृत्यू
मे - 35 जणांचा मृत्यू
जून - 51 जणांचा मृत्यू
कोणत्या महिन्यात किती रुग्ण वाढले?
फेब्रुवारी - 26941 रुग्ण 
मार्च - 4734 रुग्ण
एप्रिल - 17974 रुग्ण
मे - 22336 रुग्ण
जून - 27610 रुग्ण


महाराष्ट्रातही कोरोनाचा वेग वाढतोय - 
राज्यात रविवारी 2962 कोरोनाच्या (Corona) नव्या रुग्णांची भर पडली आहे. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत सध्या 7671 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आज सहा कोरोनाबाधित रुग्णांनी आपला जीव गमवाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.85 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78,14,871 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.82 टक्के इतकं झालं आहे.  राज्यात सध्या 22,485 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 7671 इतके रुग्ण असून त्यानंतर पुण्यात 5063 सक्रिय रुग्ण आहेत.


देशात 16,103 नवीन कोरोनाबाधित -
देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होताना दिसत नाहीय. गेल्या 24 तासांत देशात 16 हजारहून अधिक नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेत सक्रिय रुग्णांची संख्याही एक लाखांच्या पुढे गेली आहे. देशात शनिवारी दिवसभरात 16 हजार 103 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात मागील 24 तासांत 31 रुग्णांचा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाचा संसंर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या एक लाखांच्या पुढे गेली आहे. देशात सध्या कोरोनाचे 1 लाख 11 हजार 711 सक्रिय रुग्ण आहेत. तर गेल्या 24 तासांत 13 हजार 929 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 4 कोटी 28 लाख 65 हजार 519 रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त झाले आहेत.