Weather Update : उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये गेल्या 2-3 दिवसांपासून थंडी कमी झाली आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळत आहे. दरम्यान, दुसरीकडे झारखंड आणि बिहारमध्ये पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दिल्ली आणि यूपीमध्ये पुढील 5 दिवसांमध्ये सकाळी आणि रात्री वेगवेगळ्या भागात दाट धुके पडण्याची शक्यता आहे. दरम्यान महाराष्ट्रातही थंडीचा कडाका कमी होत आहे. उत्तर महाराष्ट्रात अद्याप थंडी आहे. धुळे जिल्ह्यात आज तापमानाचा पारा पुन्हा घसरला आहे. धुळ्यात आज तापमानाचा पारा 6.5 अंश सेल्सिअस वर गेला आहे. राज्यात अन्य ठिकाणी उन्हाचा चटका वाढू लागला आहे.  


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत सध्या हवामान बदलू शकते. दिवसा तापमानात वाढ होऊ शकते, त्यामुळे थंडी कमी होऊन लोकांना दिलासा मिळू शकतो. त्याचवेळी, सायंकाळी थंडी वाढू शकते. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, येत्या काही दिवसात दिल्लीतही थंड वारे वाहू शकतात. त्याचवेळी, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीच्या लगतच्या राज्यांसह पश्चिम उत्तर प्रदेशात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच आज आणि उद्या बंगालमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. पाऊस थांबल्यानंतर राज्यात थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


पंजाबमध्ये थंडी कायम 


पंजाबमधील जनतेला अद्याप थंडीपासून दिलासा मिळालेला नाही. खरे तर पंजाबमध्ये सकाळी धुके पडल्यानंतर दिवसभरात वातावरण स्वच्छ होत असले तरी थंडी कायम आहे. मात्र, सूर्यप्रकाशामुळे दिवसा थंडी कमी जाणवते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून तापमानात फारसा बदल झालेला नाही. सध्या राज्यात सरासरी कमाल तापमान 20 आणि किमान तापमान 8 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत हवामान स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे.


महत्त्वाच्या बातम्या: