नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 या वर्षातील शेवटच्या 'मन की बात' या आपल्या कार्यक्रमात जनतेला नवीन वर्षाच्या आणि नाताळाच्या शुभेच्छा दिल्या. मोदींनी ग्राहक आणि व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या प्रोत्साहन योजनांचा 'मन की बात'मध्ये उल्लेख केला. मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे : ग्राहकांना प्रोत्साहित करण्यासाठी लकी ग्राहक योजना आहे, तर व्यापाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी डिजी धन व्यापार योजना आहे, असं मोदींनी सांगितलं. मोबाईल बँकिंग, ई-बँकिंग, रु-पेकार्ड, यूपीआय अशा डिजिटल पेमेंटचा उपयोग करणाऱ्या लकी ग्राहकाला बक्षीस दिलं जाईल. डीजी धन व्यापार योजना विशेष करुन व्यापाऱ्यांसाठी तयार करण्यात आली असल्याचं मोदींनी सांगितलं. प्रोत्साहन योजना समाजातील सर्व घटकांना केंद्रबिंदू ठेवून तयार करण्यात आल्या आहेत. तंत्रज्ञानाचा आणि डिडिटल पेमेंटचा वापर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचा उल्लेख मोदींनी केला. गेल्या काही दिवसांपासून कॅशलेस व्यवहार 200 ते 300 टक्क्यांनी वाढला असल्याचं मोदींनी सांगितलं. आसाम सरकारकडून डिजिटल पेमेंटसाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचंही मोदींनी कौतुक केलं. नागरिकांना कशा प्रकारे त्रास सहन करावा लागत आहे, याबाबत मला अनेकांनी पत्र लिहिली. मात्र जेवढा त्रास जनतेला होतोय, तेवढाच आपल्यालाही होत असल्याचं मोदींनी सांगितलं. वेगवेगळ्या प्रकारच्या अफवांनंतरही देशवासियांनी संयम बाळगला, असंही मोदी म्हणाले. अनेकांनी पत्र लिहून आपल्याला पाठिंबा दिला. काहीही झालं तरी माघार घेऊ नका, भ्रष्टाचाराविरोधात कठोर पाऊल उचला, असं प्रोत्साहन देशवासियांनी पत्र लिहून केलं, असंही मोदींनी सांगितलं. भ्रष्टाचाराविरोधातला हा पूर्ण विराम नव्हे, तर भ्रष्टाचाराविरोधातील लढाईची सुरुवात आहे, यामध्ये आपल्याला विजय मिळवायचा आहे, असा विश्वासही मोदींनी दाखवला. दिव्यांगांसाठी सरकारने जी मोहिम हातात घेतली होती, त्याला अखेर यश आलं आहे. त्यासाठीचं विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं आहे. यामुळे दिव्यांगांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील, असं मोदींनी सांगितलं. देशातील खेळाडूंचाही मोदींनी उल्लेख केला. टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध मिळवलेल्या विजयाचंही मोदींनी कौतुक केलं.