चेन्नईला मुसळधार पावसानं झोडपलं, जनजीवन विस्कळीत
एबीपी माझा वेब टीम | 03 Nov 2017 09:32 PM (IST)
तामिळनाडूची राजधानी चेन्नईला पावसानं काल संध्याकाळपासून चांगलंच झोडपलं आहे.
चेन्नई : तामिळनाडूची राजधानी चेन्नईला पावसानं काल (गुरुवार) संध्याकाळपासून चांगलंच झोडपलं आहे. कालपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सामान्य चेन्नईकरांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे चेन्नईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी देण्यात आली होती. दरम्यान, पावसामुळे आयटी कंपन्या बंद ठेवण्याचा सल्लाही प्रशासनाकडून देण्यात आला आहे. जागोजागी मोठ्याप्रमाणात पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी वाहनं पाण्याखाली गेली आहेत. तर मरीना बीचवरील रस्त्यांना कालच्या पावसामुळे नद्यांचं स्वरूप आलं होतं. यामुळे परिवहन मंडळाची वाहनेही रस्त्यावर उतरली नाहीत. त्यामुळे संध्याकाळी कार्यालयातून घरी परतणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. हवामान विभागाने तामिळनाडू राज्याच्या तटवर्ती परिसरात मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. आणि येत्या काही तासांतही चेन्नई शहरासह राज्यभर मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.