ही निवडणूक खरी असेल तर भाजप विजयी होणार नाही : हार्दिक पटेल
एबीपी माझा वेब टीम | 14 Dec 2017 11:12 PM (IST)
ही भाजपची जुनी चाल आहे, ईव्हीएमचा घोळ लक्षात येऊ नये, म्हणून असं केलं जातं, असा आरोप हार्दिकने केला आहे.
अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलची आकडेवारी पाटीदार नेता हार्दिक पटेलच्या जिव्हारी लागली आहे. ही भाजपची जुनी चाल आहे, ईव्हीएमचा घोळ लक्षात येऊ नये, म्हणून असं केलं जातं, असा आरोप हार्दिकने केला आहे. ''एक्झिट पोलमध्ये जाणीवपूर्वक भाजपचा विजय दाखवण्यात आला आहे. जेणेकरुन ईव्हीएममध्ये काही घोळ असेल तरीही तो लपवला जाईल. भाजपची ही जुनी चाल आहे. ही निवडणूक खरी असेल तर भाजपचा विजय होणार नाही'', असं ट्वीट हार्दिक पटेलने केलं आहे. गुजरात विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपताच सर्व चॅनल्सचे एक्झिट पोल समोर आले. यामध्ये भाजपचा विजय होत असल्याचं समोर आलं. तर काँग्रेसचा पुन्हा एक पराभव होण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. एबीपी-सीएसडीएसच्या एक्झिट पोलनुसार, 182 सदस्यसंख्या असलेल्या गुजरात विधानसभेत भाजपला 117, काँग्रेस 64 आणि इतर पक्षाला एक जागा मिळत आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजप आणि काँग्रेसच्याही जागांमध्ये वाढ झाली आहे. संबंधित बातम्या :