लखनौ : हिंदूंच्या जमिनी त्यांना परत करा, असं पत्र शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी यांनी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाला पाठवलं आहे. यात वसीम रिजवींनी नऊ ठिकाणांची यादीच दिली आहे.


विशेष म्हणजे, वसीम रिजवी यांनी पाठवलेल्या यादीत कुतुबमिनारचाही समावेश आहे. कुतुबमिनारावर मुस्लिमांचा अधिकार नाही, असे रिजवी यांचे मत आहे.

कुतुबुद्दीन ऐबकने 1206 साली जैन मंदिर तोडून कुतुबमिनार बांधला. अयोध्येत मंदिर तोडून तिथेही बाबरी मशीद उभारली होती. 1526 रोजी बाबरचा सेनापती मीर बाकीने हे काम केलं होतं, असे वसीम रिजवी यांनी म्हटले आहे.

“कुठलीही जमीन हडपून दफनभूमी बनवणं शरियतच्या विरोधात आहे. तिथे नमाज अदा करता येत नाही.”, असे रिजवी यांनी म्हटले आहे.

औरंगजेबाने वाराणसीत विश्वनाथ मंदिर तोडून मशीद बांधली होती, असे म्हणत रिजवी यांनी ही मशीदही हिंदूंना सुपूर्द करण्याचे आवाहन केले आहे.

वसीम रिजवी कायमच वादग्रस्त विधानं करत असतात. याआधीही बाबरी मशीद लखनौमध्ये बांधावी असं सुचवलं होतं. त्यात मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाशी तर रिजवी यांचा छत्तीसचा आकडा आहे.

ही 9 ठिकाणं रिजवींनी हिंदूंना सोपवण्याचे आवाहन केले आहे

  1. राम मंदिर, अयोध्या, उत्तरप्रदेश
    2. केशव देव मंदिर, मथुरा, उत्तरप्रदेश
    3. अटाला देव मंदिर, जौनपूर, उत्तरप्रदेश
    4. रुद्र महालया मंदिर, बाटन, गुजरात
    5. काशी विश्वनाथ मंदिर, वाराणसी, उत्तरप्रदेश
    6. भद्रकाली मंदिर, अहमदाबाद, गुजरात
    7. अदीना मशीद, पंडुवा, पश्चिम बंगाल
    8. विजया मंदिर, विदिशा, मध्य प्रदेश
    9. मशीद क़ुतबुल इस्लाम, क़ुतुबमिनार, दिल्ली