जयपूर : राजस्थानमधील गुर्जर समाजाच्या आरक्षणाचे आंदोलन पुन्हा पेटले आहे. या आंदोलनाला आता हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी धोलपूरमध्ये दगडफेक आणि गोळीबार केला आहे. तसेच तीन गाड्यांची जाळपोळही केली आहे. धोलपूरच्या दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्गाला जाम केल्यानंतर आंदोलक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री उडाली. यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला. त्यामुळे आंदोलकांनी तीन गाड्यांची जाळपोळ केली आणि पोलिसांवर दगडफेक केली आहे.

सध्या या परिसरात प्रचंड तणावाचं वातावरण आहे. तसेच पोलिसांचा देखील मोठ्याप्रमाणात फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. आंदोलकांनी दुपारी धोलपूर शहरात आरक्षणासाठी एक बैठक घेतली. त्यानंतर आंदोलकांनी दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केला. यादरम्यान पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्ज केला. जमावानंही पोलिसांच्या अंगावर दगड भिरकावले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. पोलिसांनी गोळीबार केल्यानंतर आंदोलक चंबलकडे पळाले. दगडफेक आणि गोळीबारानंतर मोठ्या प्रमाणात घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.


गुर्जर समाजाची 5 टक्के आरक्षणाची मागणी

गुर्जर समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी यापूर्वीही आंदोलनं केली आहेत. सरकारी नोकरी आणि शिक्षणामध्ये पाच टक्के आरक्षण द्यावे अशी या समाजाची मागणी आहे.  सध्या गुर्जरांना अतिमागास श्रेणीतून एक टक्के आरक्षण मिळत आहे. राजस्थानमध्ये गुर्जर, रायका रेबारी, गडिया, लोहार, बंजारा आणि गडरिया समाजाकडून आरक्षणाची मागणी केली जात आहे.
गुर्जर आरक्षण आंदोलन 13 वर्षांपूर्वी 2006 मध्ये सुरु झाले आहे. गुर्जर आंदोलन वसुंधरा सरकारमध्ये चार वेळा तर गहलोत सरकारमध्ये दुसऱ्यांदा हे आंदोलन होत आहे. 2006 मध्ये केलेल्या आंदोलनावेळी गुर्जर आंदोलकांनी त्यांना एसटी प्रवर्गात सामावून घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर भाजप सरकारने एक समिती बनवली होती, मात्र काही निर्णय होऊ शकला नाही.

आतापर्यंत अनेक लोकं मारली गेली

गुर्जर आरक्षण आंदोलनामुळे उफाळलेल्या हिंसाचारात आजवर अनेक लोकं मारली गेली आहेत.
21 मे 2007- आंदोलनात 28 लोकांचा मृत्यू
23 मे  2008- आंदोलनात 7 लोकांचा मृत्यू
24 मे 2008- आंदोलनामुळे 23 लोकांचा मृत्यू