अहमदाबाद : गुजरात निवडणुकीत काँग्रेसने पाटीदार समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं आहे. मात्र यावरुन आता नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेस पाटीदार समाजाला आरक्षण देऊ शकते, तर मुस्लिमांना का नाही, असा सवाल एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे.


''काँग्रेसने पाटीदार समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं आहे. भाजपने पाटीदार समाजाला ओबीसीमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं आहे. काँग्रेस आणि भाजप दोघांनाही विचारायचंय की, मुस्लिमांची परिस्थिती पाटीदार समाजापेक्षा चांगली आहे का?'' असा सवाल ओवेसींनी केला.

दरम्यान काँग्रेसने यावर पलटवार केला आहे. निवडणुकीपूर्वी अशी वक्तव्य भाजपला मदत करण्यासाठी केली जातात, असं काँग्रेसने म्हटलं आहे. ''अनेक असे नेते आहेत, जे भाजपला मदत करण्यासाठी असे वक्तव्य करतात. ज्यामुळे लोकांना वाटतं, की ते भाजपच्या विरोधात आहेत. मात्र यांची हातमिळवणी असते'', असं काँग्रेसचे गुजरात प्रभारी अशोक गहलोत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान काँग्रेसच्या स्पष्टीकरणामागे ती रणनिती लपलेली आहे, जी निवडणुकीतील मतांचं गणित निश्चित करते. गुजरातमध्ये दहा टक्के मुस्लीम आहेत. मुस्लीम काँग्रससोबत असल्याचं पक्षाचं गणित आहे. तर 15 टक्के पाटीदार समाज गेल्या 22 वर्षांपासून भाजपचा मतदार मानला जातो.

याचमुळे काँग्रेसचं सध्या सर्व लक्ष पाटीदार समाजावर आहे. काँग्रेसने पाटीदार समाजाला आरक्षणाचंही आश्वासन दिलं आहे. मात्र पाटीदार समाजाला आरक्षण देणं काँग्रेससाठी सोपं नसेल. कारण सुप्रीम कोर्टाने आरक्षणाची जी 50 टक्के मर्यादा ठरवून दिलेली आहे, ती वाढत नाही तोपर्यंत आरक्षण देता येणार नाही. ती मर्यादा वाढवण्यासाठी केंद्र सरकारलाच पुढाकार घ्यावा लागेल.