GST च्या दरांमध्ये फेरबदलांची गरज : केंद्रीय महसूल सचिव
एबीपी माझा वेब टीम | 23 Oct 2017 08:37 AM (IST)
जीएसटी परिषदेची 23 वी बैठक 10 नोव्हेंबर रोजी गुवाहाटीत होणार आहे.
नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीच्या दरांमध्ये फेरबदलांची आवश्यकता आहे, असे मत महसूल खात्याचे सचिव हसमुख अढिया यांनी व्यक्त केले आहे. ते काल नवी दिल्लीत बोलत होते. सध्या देशात जीएसटीच्या दरांमुळे मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे आणि त्यामुळे जीएसटीच्या दरात बदल केल्यास छोट्या आणि मध्यम व्यापाऱ्यांवरील कराचं ओझं कमी होण्यास मदत होईल. तसेच जीएसटी करप्रणालीमुळे निर्माण झालेली स्थिती स्थिरस्थावर होण्यासाठी एक वर्षभराचा अवधी द्यावा लागेल, असंही अढिया यांनी सांगितलं. जीएसटी परिषदेची 23 वी बैठक 10 नोव्हेंबर रोजी गुवाहाटीत होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या नेतृत्त्वात पार पडणाऱ्या या बैठकीत हसमुख अढिया हे आपल्या सूचना मांडणार आहेत. अढिया ज्या सूचना मांडतील, त्या प्रत्यक्षात येणाऱ्या फिटमेंट कमिटी कसं काम करते, त्यावर अवलंबून आहे. दरम्यान, अढियांना ज्यावेळी जीएसटी स्थीर होण्यासाठी किती काळ जाईल असं विचारल्यास, ते म्हणाले, आणखी एक वर्ष लागेल. कारण जीएसटी ही सर्वांसाठी नवीन व्यवस्था आहे. जीएसटी कर प्रणालीत सर्व बदलांसाठी आणखी एक वर्षाच्या कालावधीची आवश्यकता आहे.