लखनौ: सध्या जोरदार लग्नसराई सुरु आहे. लग्न म्हटलं की, धमाल, मस्ती आणि मनसोक्त खाणंपिणं आलंच. त्यातही अनेकजण गोड पदार्थांवर जरा जास्तच तुटून पडतात. पण अशाच एका गोड पदार्थानं एका लग्नात चांगलाच घोळ घातला.


उत्तरप्रदेशमधील एका लग्नात फक्त एका रसगुल्ल्यावरुन बरंच महाभारत घडलं. गोड रसगुल्लामुळे नव्यानं जुळणाऱ्या नात्यामध्ये अक्षरश: कडवटपणा आणला.

पहिली घटना:

उत्तरप्रदेशमधील बदायूँमध्ये एका रसगुल्ल्यावरुन सुरु झालेला वाद अक्षरश: मारहाणीपर्यंत पोहचला. त्याचं झालं असं की, नवऱ्या मुलाकडील एका व्यक्तीनं जेवताना दोन रसगुल्ले मागितले. पण त्याला फक्त एकच रसगुल्ला दिला. यामुळे तो व्यक्ती खूपच भडकला. इथूनच खरा वाद वाढला.

भर मंडपात प्रचंड वाद सुरु असताना अनेक वऱ्हाडी तेथे पोहचले आणि त्यांनी थेट तिथं असणारं जेवणच फेकून दिलं. यानंतर मुलीकडच्या लोकांनी देखील तिथं धाव घेतली. त्यामुळे मंडपात बराच वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आलं. तसंच तिथं पंचायत देखील भरवण्यात आली. प्रकरण आपसात मिटवून घ्या असं आवाहन पंचायतीच्या सदस्यांनी दोन्हीकडच्या लोकांना केलं. पण यावेळी नवऱ्या मुलीनं अतिशय कणखर भूमिका घेतली आणि थेट लग्नालाच नकार दिला.

दुसरी घटना:

दुसरीकडे एका खासगी सोहळ्यात रसगुल्ले खाल्यानं शेकडो जणांना बाधा झाली. कुशीनगरच्या चौपटिया गावात किशुन चौहानच्या घरी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथं असणाऱ्या जेवण्यातील रसगुल्ल्यामुळे जवळजवळ 100 जणांना बाधा झाली.

दरम्यान सर्वांना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असू त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. चार जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.