नवी दिल्ली : देशाचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला पुन्हा एकदा खडसावलं. पाकिस्तानवर हल्लाबोल करत त्याची तुलना नरकाशी केली आहे. पाकिस्तानात आणि नरकात जाणं सारखंच आहे, असं पर्रिकर म्हणाले. हरियाणातील रेवाडीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.


 

दहशतवादाचे दुष्परिणाम पाकिस्तान स्वत: भोगत आहे. लढण्याची ताकद राहिली नाही म्हणून लहान जखमा देण्याचा विचार पाकिस्तान करतं, असं पर्रीकर म्हणाले. तसंच स्वत: शहीद होण्याऐवजी शत्रुचा खात्मा करा, असा सल्लाही त्यांनी भारतीय जवानांना दिला.

 

रेवाडीमध्ये सैन्यभरती केंद्र उभारण्याचं आश्वासन मनोहर पर्रिकरांनी यावेळी दिलं.

 

काही दिवसांपूर्वी मनोहर पर्रिकर यांनी दहशतवाद आणि अशांत बलुचिस्तानच्या मुद्द्यावर पाकिस्तानल लक्ष्य केलं होतं. पाकिस्तान जेव्हा आमच्याकडे 10 जिहादी पाठवतं तेव्हा तिथे कुठे ना कुठे बॉम्बस्फोट होतो आणि 70-80 लोक मारले जातात. स्वातंत्र्यदिनी सीमेवरुन झालेल्या घुसखोरीच्या मुद्द्यावर पर्रिकर यांनी हे विधान केलं.