नवी दिल्ली: "48 वर्षे विरुद्ध 48 महिने" हा नारा देत मोदी सरकार आपल्या चौथ्या वर्षपूर्तीचं सेलिब्रेशन करणार आहे. येत्या 27 मे रोजी मोदी सरकारला केंद्रात चार वर्षे पूर्ण होत आहेत.


निवडणुका आता अवघ्या वर्षभरावर आल्यानं यावेळी आपल्या कामाचा हिशेब देण्यासाठी, काँग्रेसच्या आणि आपल्या सरकारमधल्या कामगिरीचा फरक दाखवण्यासाठी ही थीम निवडण्यात आली आहे.

या निमित्तानं सरकारने केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मोदी सरकारनं नेहमीप्रमाणे जंगी कार्यक्रम आखला आहे.

48 वर्षे विरुद्ध 48 महिने अशा थीमवर आपलं सरकार कसं काँग्रेसच्या सरकारपेक्षा दमदार आहे हे सांगण्याचाही प्रयत्न होणार आहे. प्रत्येक गावात वीज पोहचवल्याचं लक्ष्य पूर्ण केल्याचा दावा सरकारनं केला आहे.

त्यानंतर आता घराघरात वीज पोहोचवण्याचं आपलं उद्दिष्ट असेल, उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून आणखी पाच कोटी घरांमधला अंधार दूर केला जाईल, शिवाय दिवसाला 50 किमी रस्ते बनवण्याचं महत्वकांक्षी लक्ष्य जनतेसमोर ठेवलं जाणार आहे.

याशिवाय दरवर्षीप्रमाणे याही वेळा वेगवेगळ्या माध्यमांतून सरकारच्या कामगिरीचा प्रचार होणार आहे. सर्व मंत्र्यांची फौज देशाच्या कानाकोपऱ्यात फिरुन पत्रकार परिषदा, सभा यांच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहे.

चौथ्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं नव्या थीमवर जाहिरातीही ऐकवल्या जाणार आहेत. कर्नाटकची रणधुमाळी संपल्यावर मोदी सरकारचं सर्व लक्ष्य या सेलिब्रेशनच्या कामावर एकवटेल असं दिसतंय.

याआधीच्या वर्षातल्या थीम काय होत्या? 

अगदी पहिल्या वर्षापासून मोदी सरकार आपल्या कामाचा अगदी जोरात डांगोरा पिटत आलेलं आहे.

  • पहिल्या वर्षीची थीम- वर्ष एक, काम अनेक

  • दुस-या वर्षीची थीम- मेरा देश बदल रहा है, आगे बढ रहा है

  • तिस-या वर्षाची थीम- तीन साल बेमिसाल

  • चौथ्या वर्षाची थीम- 48 साल बनाम 48 महिने