नवी दिल्ली: काँग्रेसप्रणित यूपीए सरकारच्या काळात गाजलेल्या कोळसा घोटाळाप्रकरणी, झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला.


मधू कोडांना तीन वर्षांचा कारावास आणि 25 लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

दुसरीकडे कोडांशिवाय माजी सचिव एस सी गुप्ता यांनाही तीन वर्षांची शिक्षा आणि 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.  तर या घोटाळ्यात सहभागी असलेली कंपनी VISUL ला तब्बल 50 लाख रुपयांचा दंड सुनावण्यात आला.

याशिवाय दोषी विजय जोशी यांनाही 3 वर्षांचा कारावास आणि 25 लाखांचा दंड,  ए के बसू यांनाही तीन वर्षाची जेल आणि 1 लाखांचा दंड ठोठावण्यात आला.

विशेष सीबीआय कोर्टानं बुधवारी मधू कोडांसह चार जणांना दोषी ठरवलं होतं. त्यानंतर आज मधू कोडांना शिक्षा सुनावण्यात आली.

अनियमित पद्धतीनं कोळसा खाणीच्या कंत्राटांचे वाटप करण्यात आल्याचा आरोप मधू कोडा आणि सचिव गुप्ता यांच्यावर करण्यात आले होते. यात एका चार्टर्ड अकाउंटंटसह अनेकांचा समावेश आहे.

यूपीए सरकारच्या काळात जे घोटाळे गाजले होते. त्यापैकीच हा कोळसा घोटाळा आहे. अनियमित पद्धतीनं खाण वाटप करण्याचा आरोप सिद्ध झाल्यानं मधू कोडा यांच्यासह सर्व आरोपींना कट रचणं आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आलं.

या घोटाळ्याची राजकीय वर्तुळात आणि देशभरात बरीच चर्चा झाली होती. यूपीए सरकार जाण्यामागे हे देखील एक कारण असल्याचं अनेकांचं मत आहे.

संबंधित बातम्या

कोळसा घोटाळा : झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडांसह चारजण दोषी 

गुडघाभर चिखलात झारखंडच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या हातात नांगर!