बिहारमध्ये पावसाचं थैमान, जनजीवन विस्कळीत
एबीपी माझा वेब टीम | 14 Aug 2017 03:10 PM (IST)
बिहारमध्ये पावसानं धुमाकूळ घातल्यानं अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवली आहे.
पाटणा : बिहारमधील एकूण 9 जिल्ह्यामध्ये पावसानं धुमाकूळ घातल्यानं बऱ्याच ठिकाणी पूरपरिस्थिती पाहायला मिळत आहे. उत्तरेकडील किशनगंज, अररिया, सुपैल, कटिहार, पूर्णिया आणि नालंदा या जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. किशनगंज जिल्ह्यातून वाहणाऱ्या महानंदा नदीला देखील पूर आला आहे. बिहारमध्ये मागील आठवडाभर जोरदार पाऊस सुरु होता. तसेच पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकीकडे जोरदार पाऊस सुरु असताना दुसरीकडे नेपाळनंही 2.5 लाख क्यूसेस वेगानं पाणी सोडल्यानं बिहारमधील परिस्थिती आणखी बिघडली आहे. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी हवाई दौराही केला. दुसरीकडे, नेपाळमध्ये आलेल्या पुरामध्ये 700 पर्यटक अडकले असून त्यामध्ये 200 भारतीयांचा समावेश आहे. मुसळधार पावसामुळं नेपाळमधल्या 1 हजार घरांचं नुकसान झालं आहे.