श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये कालपासून (मंगळवार) जोरदार बर्फवृष्टी सुरु असून गुरेज आणि नौगाम सेक्टरमधील नियंत्रण रेषेजवळील तब्बल पाच जवान बेपत्ता झाल्याची माहिती समजते आहे. लष्कराच्या एका अधिकाऱ्यानं याबाबत माहिती दिली आहे.


या परिसरात सध्या जोरदार बर्फवृष्टी आणि पाऊसही सुरु आहे. तसेच पुढील काही दिवस बर्फवृष्टी कायम राहणार असल्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे.

लष्कराचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, 'नौगाम सेक्टर (कुपवाडा जिल्हा) मध्ये दोन सैनिक हे एका उतारावरुन खाली पडले तर इतर तीन सैनिक हे जोरदार बर्फवृष्टीमुळे गुरेज येथील कंजालवान सब-सेक्टरच्या चौकीतून बेपत्ता झाले आहेत.' दरम्यान, या पाचही सैनिकांचा सध्या शोध सुरु असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

हिमस्स्खलनामुळे गुरेज सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ बक्तूर चौकी उद्धवस्त झाली आणि त्यानंतर तीन जवान बेपत्ता झाले. अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्यांनं देखील दिली आहे. या पाचही जवानांचा कसून शोध सुरु आहे. पण जोरदार बर्फवृष्टीमुळे या सर्च ऑपरेशनमध्ये बरेच अडथळे येत आहेत.