नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियातून काही मेसेज व्हायरल होत आहेत. या मेसेजमधून मोदी सरकार एक नवं विधेयक आणण्याच्या तयारीत आहे, ज्यातून तुमचे बँक खात्यात जमा असलेले पैसे बुडण्याची शक्यता आहे, असा दावा केला जात आहे. पण यावरुन अर्थमंत्री अरुण जेटलींनी  स्पष्टीकरण दिलं आहे. ‘बँकेत जमा असलेले खातेदारांचे सर्व पैसे सुरक्षित आहेत,’असं अरुण जेटलींनी सांगितलं आहे.


जेटली म्हणाले की, “सध्या भारत सरकार बँक खातेदारांच्या हिताच्या रक्षणसाठी त्यासंबंधित व्यवस्था मजबूत करत आहे. प्रस्तावित फायनान्शियल रेझ्यूलेशन अॅण्ड डिपॉझिट विधेयक (FRDI) हे संयुक्त समितीसमोर आहे. समितच्या शिफारशीवर केंद्र सरकार गांभीर्यानं विचार करेल. अजून अशाप्रकारचं कोणतंही विधेयक मंजूर झालेलं नाही. यासंदर्भात कायदा बनवताना खातेदारांच्या अधिकारांचे संपूर्णपणे संरक्षण केलं जाईल. पण त्यापूर्वी दोन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम देऊन, बँकिंग व्यवस्थेला बळकट केलं जात आहे.”

दरम्यान, फायनेन्शियल रेझ्यूलेशन अॅण्ड डिपॉझिट विधेयकाचा मसुदा ऑगस्ट महिन्यातच संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात आला होता. हे विधेयक संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात सादर केलं जाईल.

काय आहे दावा?

सोशल मीडियातून करण्यात आलेल्या दाव्यानुसार, “नव्या विधेयकामुळे सार्वजनिक क्षेत्रातील (PSU) बँकांना असा अधिकार दिला जाईल. ज्यातून दिवाळखोरीच्या स्थितीतील बँका स्वत: निश्चित करतील की, खातेदारांना त्यांच्या खात्यावरील किती पैसे परत द्यायचे आहेत. म्हणजेच, बँक जर दिवाळखोर झाली, तर त्यांचे पैसे देखील बुडतील.”

दरम्यान, देशभरातील 63 टक्के जनतेची कमाई सरकारी बँकांमध्ये जमा आहे. तर केवळ 18 टक्केच लोकांची कमाई खासगी बँकांमध्ये जमा आहे.

संबंधित बातम्या

'हे' विधेयक आल्यास बुडीत बँक तुमच्या खात्यातील पैसे उचलणार?