S Jaishankar Pakistan Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाहोरला 2015 मध्ये अचानक भेट दिल्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. डिसेंबर 2015 मध्ये भारताच्या तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही पाकिस्तानला भेट दिली होती. त्यानंतर 9 वर्षांनी पुन्हा एकदा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर 15-16 ऑक्टोबरला पाकिस्तानला भेट देणार आहेत. ते इस्लामाबादमध्ये SCO प्रमुखांच्या (Shanghai Cooperation Organisation ) बैठकीला उपस्थित राहणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज शुक्रवारी (4 ऑक्टोबर) ही माहिती दिली. गेल्या 9 वर्षात भारतीय मंत्री पाकिस्तानला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत जयशंकर यांचा दौरा भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्याचा प्रयत्न आहे का? असा प्रश्न जयस्वाल यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी उत्तर दिले की भारत एससीओ चार्टरसाठी वचनबद्ध आहे. त्यामुळेच परराष्ट्रमंत्र्यांच्या दौऱ्याचे कारण आहे. यावरून दुसरा अर्थ काढू नये.


आता पाकिस्तानशी कोणत्याही संबंधांचा विचार का करावा?


वास्तविक 29 ऑगस्ट रोजी पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना SCO बैठकीसाठी आमंत्रित केले होते. पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी सांगितले की, बैठकीत सहभागी होण्यासाठी सर्व सदस्य देशांच्या प्रमुखांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. पाकिस्तानचे निमंत्रण मिळाल्यानंतर जयशंकर यांनी 30 ऑगस्ट रोजी दोन्ही देशांमधील संबंधांवर वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, पाकिस्तानशी चर्चेचा टप्पा संपला आहे. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, प्रत्येक कामाचा शेवट होतो. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आले, हा मुद्दा संपला आहे. आता पाकिस्तानशी कोणत्याही संबंधांचा विचार का करावा?


मागच्या वेळी सुषमा स्वराज पाकिस्तानात गेल्या होत्या


पंतप्रधान मोदी यांनी अखेरची लाहोरला 2015 मध्ये अचानक भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेतली. यानंतर डिसेंबर 2015 मध्ये भारताच्या तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही पाकिस्तानला भेट दिली होती. त्यांच्या दौऱ्यानंतर भारताचा एकही पंतप्रधान किंवा मंत्री पाकिस्तानला गेला नाही. 2016 मध्ये, भारतीय जवानांच्या वेशात चार दहशतवादी उरी येथील भारतीय लष्कराच्या ब्रिगेड मुख्यालयात घुसले. 3 मिनिटांत दहशतवाद्यांनी कॅम्पवर 15 हून अधिक ग्रेनेड फेकले होते. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे 19जवान शहीद झाले. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी, भारतीय लष्कराने पीओकेमध्ये प्रवेश केला आणि 28-29 सप्टेंबरच्या रात्री सर्जिकल स्ट्राइक केला. पहाटेपर्यंत कारवाई पूर्ण करून भारतीय लष्कर परतले. या हल्ल्यात 38 दहशतवादी मारले गेले. तेव्हापासून दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव वाढला होता.


पीएम मोदी एससीओ समिटलाही गेले नव्हते


या वर्षी 3-4 जुलै रोजी कझाकिस्तानमध्ये झालेल्या SCO शिखर परिषदेला पंतप्रधान मोदी उपस्थित राहिले नाहीत. त्यांच्या जागी परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. गेल्या वर्षी, किर्गिस्तानची राजधानी बिश्केकने SCO च्या CHG बैठकीचे आयोजन केले होते. यात पंतप्रधान मोदीही जाऊ शकले नाहीत. त्यांच्या जागी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर उपस्थित होते. भारताने गेल्या वर्षी 4 जुलै रोजी व्हर्च्युअल पद्धतीने SCO शिखर परिषदेचे आयोजन केले होते. त्यात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ ऑनलाइन सहभागी झाले होते.


बिलावल गेल्या वर्षी फक्त SCO साठी भारतात 


यापूर्वी मे 2023 मध्ये, पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी गोव्यात SCO परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी भारतात आले होते. त्यानंतर एका व्हिडिओ संदेशात भुट्टो म्हणाले होते की, या बैठकीत सहभागी होण्याचा माझा निर्णय पाकिस्तानसाठी एससीओ किती महत्त्वाचा आहे हे दिसून येते. बिलावल यांची ही भेट 12 वर्षांतील पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची पहिली भेट होती. जुलै 2022 च्या बैठकीत सर्व आठ SCO सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री उपस्थित होते. जयशंकर यांनी शिखर परिषदेच्या बाजूला 7 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली, परंतु बिलावल यांच्याकडे दुर्लक्ष केले. उझबेक राष्ट्राध्यक्षांनी सर्व परराष्ट्र मंत्र्यांसाठी डिनरचे आयोजन केले तेव्हा बिलावल आणि जयशंकर स्वतंत्रपणे बसले.


इतर महत्वाच्या बातम्या