ईव्हीएमच्या हॅकिंगचा दावा, सी ग्रेड चित्रपटाची पडेल स्टोरी
एबीपी माझा वेब टीम | 22 Jan 2019 11:39 PM (IST)
सोमवारी एका कथित हॅकरने एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेची सुरुवातच मोठी ड्रामेबाज होती. सय्यज शुजावर अमेरिकेतून लंडनला येण्याआधी हल्ला करण्यात आला, असा दावा करण्यात आला. मात्र यानिमित्ताने काही प्रश्न उपस्थित झाले.
उस्मानाबाद : एव्हीएम मशिन या 2014 च्या निवडणुकीत हॅक झाल्या. त्यावेळी सरकार काँग्रेस आघाडीचं होत. आघाडीची दोन टर्म पुर्ण होत असताना सार्वत्रिक नाराजी दिसत होती. परंतु याचा अर्थ गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आघाडी सरकारची सगळी यंत्रणा, निवडणूक आयोग यांना आपल्या बाजून वळवून इव्हीएम हॅक केल्या आणि त्याची सरकार मध्ये बसलेल्या कोणालाही पुसटशीही कल्पना आली नाही. सोमवारी एका कथित हॅकरने एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेची सुरुवातच मोठी ड्रामेबाज होती. सय्यज शुजावर अमेरिकेतून लंडनला येण्याआधी हल्ला करण्यात आला, असा दावा करण्यात आला. मात्र यानिमित्ताने काही प्रश्न उपस्थित झाले. प्रश्न पहिला- एवढा मोठा खुलासा करणाऱ्या सय्यदला मारेकऱ्यांनी जिवे न मारता, फक्त डोक्यात घाव घालून सोडून दिले. यावर विश्वास कसा ठेवायचा? 2009 ते 2014 पर्यंत सय्यद हा इव्हीएम मशिनचं उत्पादन करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचा कर्मचारी होता. परंतु आपली सगळी ओळख पुसून टाकण्यात आली आहे असं शुजानं सांगितले. 2013 मध्ये सय्यद आणि १४ जणाच्या टीमला इव्हीएम हॅक होतात का हे पाहण्यास सांगितले गेले. ते त्यांनी केले. शुजा म्हणतो. नंतर मंत्री गोपीनाथ मुंडे आले आणि म्हणाले. आपण नव्या हँकींग फ्री मशिन तयार करु. पुढे हैदराबादच्या निवडणुकीत ईव्हीएम हॅक केले गेले असं शुजाच्या टीमच्या लक्षात आल्यावर हे तेव्हाच जाहीर न करता शुजाच्या टीमनं भाजपाच्या मंडळीकडून पैसे उकळण्याचा प्लॅन केला. असं स्वत:च शुजा म्हणतोय. यात सगळ्यात मोठी विसंगती 2013 मध्ये गोपीनाथ मुंडे मंत्रीच नव्हते. शुजाचा प्लॅन नेमका काय? कमलराव आला आणि आम्ही पैसे कमावण्याचा प्लॅन केला. शुजा आणि १४ जणांची टीम हैदराबादच्या उपनगरात भाजपा नेत्याकडून पैसे घेण्यासाठी गेले आणि तिथे त्यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्याचा दावा शुजानं केला आहे. प्रश्न दुसरा- आता प्रश्न असा आहे. एवढ्या जवळून गोळ्या झाडल्यावरही शुजा कसा वाचला...? भाजपाच्या नेत्याने शुजाच्या टीम मधली जी माणसे मारली त्यांचं कव्हर अप करण्यासाठी हैदराबादमध्ये हिंदू मुस्लिम दंगल घडवली गेली असा दावा शुजा करतो. आम्ही गूगल केल्यावर लक्षात आलं. 14 मे 2014 ला हैदराबादमध्ये दंगल झाली होती. पण ती शिख समुदाय आणि मुस्लिम समुदायात होती. त्यात बीएसएफच्या फायरिंगमध्ये 3 जण ठार 7 जण जखमी झाले होते. प्रश्न तिसरा शुजाच्या टीमच्या 13 माणसांची प्रेत गेली कुठं? या १३ जणांच्या कुटुंबीय गप्प का आहे? पत्रकार परिषदेला कपिल सिब्बल यांची हजेरी आणि हॅकिंगमुळे गोपीनाथ मुंडेंच्या हत्येचा दावा त्यामुळे या पत्रकार परिषदेला महत्त्व आलं. प्रश्न चौथा- गोपीनाथ मुंडेंना ईव्हीएम हॅकिंगचं कसं कळलं..? कोणी सांगितंल..? ते का भाजपला उघडं पाडणार होते..? या विषयी शुजाकडे उत्तर नाहीत. तंजील महंमद या एनआयच्या अधिकाऱ्याने गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूचा तपास चालवला होता. त्यांचा २०१५ मध्ये खून झाला असं शुजा म्हणतोय. प्रत्यक्षात एप्रिल २०१६ मध्ये तंजील यांचा खून झाला. कौटुंबीक कारणामुळे, संपत्तीच्या वादामुळे हा खून झाला होता. त्याचे सीसीटीव्ही फुटेज आहेत. ही घटना घडली तेंव्हा उत्तर प्रदेशमध्ये अखिलेशचं सरकार होते. दिल्लीच्या मुख्यमंत्री केजरीवालांनी तंजीलच्या कुटुबाला मदत म्हणून १ कोटी रुपये दिले होते...शुजचा हा दावा बकवास आहे. ईव्हीएम हॅकिंगच्या अनेक तक्रारी आल्यावर ईव्हीएम हॅक करून दाखवण्याचे सर्वच राजकीय पक्ष निवडणूक विभागानं जाहीर आवाहन केलं होते. प्रत्येक पक्षाला ३ तासाचा वेळ देण्यात आला होता. परंतु ईव्हीएम हॅक करून दाखवणं कुणालाही शक्य झालं नाही. शुजाची पत्रकार परिषद २०१९ च्या निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आलेला ड्रामा आहे. एक निव्वळ बकवास..सी ग्रेड चित्रपटाची पडेल स्टोरी...