नवी दिल्ली : अमेरिकेत राहणाऱ्या एका सायबर हॅकरने ईव्हीएम हॅकिंगबाबत केलेल्या दाव्यानंतर भारताच्या मुख्य निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. "या प्रकरणाचा वेगळा तपास केला जात असून कायदेशीर कारवाईचा विचार सुरु आहे," असं निवडणूक आयोगाने सांगितलं.


हॅकरच्या आरोपांनतर भारताच्या निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रक जारी करुन आपली बाजू मांडली आहे. "भारतीय निवडणूक आयोगाच्या लक्षात आलं की, लंडनमधील एका कार्यक्रमात ईव्हीएम हॅक करण्याचा डेमो ठेवला होता. जाणीवपूर्वक केल्या जाणाऱ्या या अपप्रचाराकडे ईसीआयचं गांभीर्याने लक्ष आहे. निवडणुकीदरम्यान वापरले जाणारे ईव्हीएम पूर्णत: सुरक्षित आहेत," असं या पत्रकात म्हटलं आहे.

प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटलं आहे की, "हे ईव्हीएम भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने तयार केला आहे. यादरम्यान कडेकोट देखरेख आणि सुरक्षा असले. 2010 मध्ये स्थापन झालेल्या तांत्रिक तज्ज्ञांच्या समिती प्रत्येक टप्प्यात निश्चित मानकानुसार कठोर देखरेख करते." या प्रकरणात कायदेशीर कारवाई करता येऊ शकते का, याबाबतही विचार सुरु असल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

ईव्हीएम हॅकिंगमुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या, हॅकरचा दावा

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ईव्हीएम हॅक केल्याचा दावा आंतरराष्ट्रीय हॅकरने केला आहे. विशेष म्हणजे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएम हॅकिंगबद्दल सर्व माहिती असल्यामुळे पक्षातील नेत्यांनीच त्यांची हत्या केल्याचा आरोप हॅकरने केला.

लंडनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सय्यद शुजा या हॅकरने अत्यंत खळबळजनक आरोप केले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन) हॅक करण्याचं तंत्र आपल्याकडून आत्मसात केल्याचंही हॅकरने म्हटलं आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीतही भाजपचा ईव्हीएम हॅक करुन जिंकण्याचा प्रयत्न होता. परंतु आपण त्यांच्याकडून होणारे 'फ्रिक्वेन्सी ट्रान्समिशन' थांबवून आपच्या बाजूने निकाल वळवला असा दावा देखील या हॅकरने केला आहे.

2014 मधील लोकसभा निवडणुकांच्या वेळी गोपीनाथ मुंडेंनी आपल्याशी संपर्क साधला होता, असा दावा सय्यद शुजाने केला. गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएम हॅक केल्याची माहिती होती. मुंडे ही बाब जगजाहीर करण्याच्या भीतीनेच भाजपमधील काही नेत्यांनी त्यांची हत्या घडवून आणली, असा दावा सय्यद शुजाने यावेळी केला.

गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची 'रॉ'मार्फत चौकशी व्हावी : धनंजय मुंडे

गोपीनाथ मुंडे यांचं राजधानी दिल्लीत कार अपघातामध्ये निधन झालं होतं. 3 जून 2014 रोजी दिल्ली विमानतळावर जाताना त्यांच्या गाडीला एका वेगवान कारने धडक दिली होती. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुंडेंना तातडीने 'एम्स'मध्ये दाखल करण्यात आलं, मात्र कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांची प्राणज्योत मालवली.