''... तर दहशतवादाला बळी पडलेले 35 हजार लोकही अल्पच का?''
एबीपी माझा वेब टीम | 21 Nov 2016 06:07 PM (IST)
नवी दिल्ली : देशात अल्पप्रमाणात बनावट नोटा असल्याच्या माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या दाव्याला खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. चलनात 400 कोटींच्या बनावट नोटा आहेत, त्यांना अल्प म्हणता येईल का, असा सवाल नरेंद्र जाधव यांनी केला. पी. चिदंबरम यांनी नोटाबंदीवरुन सरकारवर टीका केली होती. नोटाबंदीचा निर्णय हा विचापपूर्वक घेतला नसल्याचं म्हटलं होतं. शिवाय अल्प प्रमाणातील बनावट नोटांसाठी नोटाबंदी योग्य नसल्याचंही मत व्यक्त केलं होतं. भारतात गेल्या 23 वर्षांत 35 हजार लोक दहशतवादाचे बळी ठरले, त्यांनाही एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात अल्पच म्हणाल का, असा सवाल नरेंद्र जाधव यांनी केला. या न्यायाने मग दहशतवादाची समस्या उरलीच नाही असं म्हणावं लागेल. शिवाय प्रमाण अत्यल्प असलं म्हणून समस्या गंभीर नाही असं होत नाही, असंही नरेंद्र जाधव यांनी सांगितलं. 400 कोटींच्या बनावट नोटांनी 35 हजार जीव घेतलेत हे विसरू नका, अशा शब्दात नरेंद्र जाधव यांनी ठणकावलं.