नवी दिल्ली : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कधी नव्हे इतके घट्ट पाय भाजपने रोवले आहेत. महापौरपदावरचा दावा सोडू नका, कुठल्याही परिस्थितीत मुंबईमध्ये आपला महापौर बसला पाहिजे, अशा स्पष्ट सूचना भाजपच्या दिल्ली मुख्यालयातून राज्यात देण्यात आलेल्या आहेत.


भाजपच्या आणि शिवसेनेच्या जागांमध्ये केवळ दोन जागांचाच फरक आहे. त्यामुळे अपक्षांना आपल्या पारड्यात ओढून महापौरपदावर दावा सांगण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी सुरु झाला आहे. काही अपक्ष आपल्या संपर्कात असल्याचं दोन्ही बाजूचे नेते सांगत आहेत.

मुंबईत कुणाचा महापौर बसणार? सत्तेची समीकरणं

दिल्लीवरुन काल महापौरपदाबाबत आक्रमक राहण्याचे आदेश आल्यानंतर राज्यातली भाजपही त्यादृष्टीने सक्रिय झाली आहे. महापौरपदाबद्दल विचारलं असता भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी, प्रश्नच नाही, आमचाच महापौर मुंबईत असणार याबद्दल शंका नाही, अशी प्रतिक्रिया 'एबीपी माझा'ला दिली आहे.

37 हजार कोटींचं बजेट, देशातली सर्वात महापालिका, बॉलिवूडनगरी अशी बिरुदं मिरवणाऱ्या मुंबईत आपला महापौर असणं हे भाजपश्रेष्ठींना प्रतिष्ठेचं वाटत आहे.

मुंबईत अमराठी नगरसेवकांची संख्या वाढली!

बहुमतासाठी मुंबईत 114 जागांची गरज आहे. भाजप 82 तर शिवसेना 84 जागांवर विजयी झाली आहे. केवळ राज ठाकरेंच्या मनसेला सोबत घेऊन कुणालाही सत्ता स्थापनं शक्य नाही. कारण राज यांच्याकडे केवळ 7 नगरसेवक आहेत. त्यामुळेच अपक्षांच्या मदतीने आपलं संख्याबळ फुगवायचं आणि सत्तास्थापनेसाठी सेना-भाजपला एकत्र येण्याशिवाय पर्याय नसला तरी महापौरपदावरचा दावा मात्र सोडायचा नाही, अशी रणनीती आखण्यात आली आहे.

तर भाजपच्या 88 जागा मुंबईत निवडून आल्या असत्या..

त्यामुळे आता लवकरच सत्तास्थापनेसाठी वाटाघाटी सुरु झाल्या तरी या चर्चा करताना महापौरपदावरुन मात्र एकमेकांवर कुरघोडी करण्याचे डावपेच सुरुच राहतील. 2014 नंतर भाजपमध्ये जे मोदीपर्व सुरु झालं आहे, त्याचाच परिपाक म्हणून शिवसेनेबद्दल या आक्रमक पवित्र्याकडे पाहिलं जातं आहे.