नवी दिल्ली : राजकारणातील अनेक खेळींची तुलना बुद्धिबळाच्या चालींशी करत असतो. राज्यसभा निवडणुकीबाबत बोलायचं झालं तर दोन्ही वजीर एकमेकांसमोर उभे आहेत. अहमद पटेल हे काँग्रेसचे चाणक्य आहेत. त्यांच्यासमोर आज अमित शाह यांच्या रुपाने तेवढाच तगडा आणि त्याच खेळात वाकबगार असलेला उमेदवार आहे. त्यामुळे राज्यसभेची निवडणूक कधी नव्हे ते इतकी रोमांचक बनली आहे. 2014 लोकसभा निवडणुकीनंतरची काँग्रेस आणि भाजपमधील ही बिग फाईट आहे.


अहमद पटेल पाचव्यांदा राज्यसभेवर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पण राज्यसभेत आता भाजप सर्वात मोठा पक्ष बनला आहे. भाजपला एकही जागा सहजरित्या गमवायची नाही. त्यामुळे गुजरातच्या राज्यसभा निवडणुक अहमद पटेल यांना कडवं आव्हान दिलं आहे.

मात्र या सगळ्या प्रकरणाला वैयक्तिक संघर्षाची पार्श्वभूमी पटेल आणि शाह यांच्या नात्याला आहे. त्याचाच बदला घेण्यासाठी राज्यसभा निवडणुकीत अमित शाहांनी अहमद पटेल यांना आव्हान दिलं आहे.

एक काळ असा होता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह एक वर्षासाठी तडीपार होते. त्यांना गुजरातबाहेर राहावं लागलं होतं. यामागे अहमद पटेल यांची मोठी भूमिका असल्याचं म्हटलं जात आहे.

सोहराबुद्दीन एन्काऊंटरमध्ये अमित शाह यांना तुरुंगवारी करावी लागली. केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना अमित शाह यांच्यावर कारवाई झाली. या कारवाईला अहमद पटेल यांनीच खतपाणी दिल्याची चर्चा आहे. तसंच इशरत जहाँ एन्काऊंटरप्रकरणी अमित शाह यांच्यामागे सीबीआयचा ससेमिरा लागला. यूपीए सरकारमुळेच त्यांना तडीपार व्हाव लागल्याचं म्हटलं जातं. या दोन प्रकरणांमुळेच दोघांमध्ये दशकभरापासून वितुष्ट आलं.

दरम्यान, डिसेंबरमध्ये गुजरात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याआधी अहमद पटेल यांच्यासारखा तगडा नेता पराभूत झाला तर तो काँग्रेससाठी नैतिक मनोधैर्य खच्ची करणारा असेल. त्यामुळे ही निवडणूक अहमद पटेल पर्यायाने काँग्रेससाठी प्रतिष्ठेची आहे.