नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत 2012मधील निर्भया गँगरेपमुळे संपूर्ण देश हळहळला होता. अखेर या प्रकरणातील दोषींच्या फाशीच्या तारखेवर  शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने निर्भयाच्या चारही दोषींच्या डेथ वॉरंटला मंजूरी दिली आहे. तिहार जेलमध्ये 22 जानेवारी सकाळी 7 वाजता दोषींच्या शिक्षेवर अंमलबजावणी होणार असून त्यांना फाशी देण्यात येणार आहे.


निर्भया सामुहिक बलात्कारप्रकरणी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने याप्रकरणातील चारही आरोपींविरोधात डेथ वॉरंट जारी केलं आहे. या चारही आरोपींची फाशी कायम ठेवण्यात आली असून 22 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता त्यांना फाशी देण्यात येणार आहे. निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपी मुकेश, विनय शर्मा, अक्षय कुमार सिंह आणि पवन गुप्ता यांना कोर्टाने यापूर्वीच फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. या चौघेही तिहार तुरुंगात होते. आज त्यांच्या डेथ वॉरंटवर दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टाने त्यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे.


काय आहे निर्भया गँगरेप प्रकरण?
- सात वर्षांपूर्वी म्हणजेच 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत 23 वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला होता.
- सिनेमा पाहून आल्यानंतर मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय सहा जण होते.
- त्यांनी निर्भयासोबत छेडछाड करायला सुरुवात केली. विरोध केल्याने आरोपींनी तिच्या मित्राला एवढी मारहाण केली की तो बेशुद्ध झाला.
- यानंतर एकटीच असलेल्या निर्भयावर सहा नराधमांनी धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला. एवढंच नाही तर अनन्वित अत्याचार केले.
- तरुणीला गंभीर जखमी केल्यानंतर नराधमांनी दोघांना दक्षिण दिल्लीच्या महिपालपूरजवळच्या वसंत विहार परिसरात धावत्या बसमधूनच रस्त्यावर फेकलं.
- दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
- मात्र 29 डिसेंबर रोजी उपचारांदरम्यान माऊंट एलिझाबेथ रुग्णालयातच तिने अखेरचा श्वास घेतला.


दरम्यान, पवन गुप्ता, मुकेश सिंह, अक्षय ठाकूर आणि विनय शर्मा अशी या चार दोषींची नावं आहेत. तर या प्रकरणातील राम सिंह नावाच्या आरोपीने तिहार तुरुंगातच आत्महत्या केली होत. याशिवाय एक आरोपी अल्पवयीन असल्याने, ज्युवेनाईल कोर्टाने त्याला तीन वर्षांची शिक्षा ठोठावत त्याची रवानगी बालसुधारगृहात केली होती. 2015 रोजी त्याची सुटका झाली.