नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांचा भारतरत्न पुरस्कार परत घेण्यात यावा, असा प्रस्ताव दिल्लीच्या विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. आम आदमी पार्टीने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. राजीव गांधी यांना भारतरत्न या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. मात्र राजीव गांधी हे शीख दंगलीतील दोषी असल्याचा आरोप आप सरकारने केला आहे.


गांधी कुटुंबाकडून हा पुरस्कार परत घेण्यात यावा कारण 1984 मध्ये उसळलेल्या शीख दंगलीत राजीव गांधी दोषी होते असा आरोप आप सरकारने केला आहे. याच आरोपामुळे आपने राजीव गांधी यांचा भारतरत्न पुरस्कार परत घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

दरम्यान हा प्रस्ताव व्यक्तिगत पातळीवर सदनात ठेवला गेला असून अजून यावर कुठलाही निर्णय झाला असल्याचे आपचे प्रवक्ते आणि आमदार सौरभ भारद्वाज यांनी सांगितले आहे.

या प्रस्तावावर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. राजीव गांधी यांनी या देशासाठी आपला जीव दिला, मात्र आपने त्यांच्याबाबत जो प्रस्ताव मंजूर केला आहे त्यामुळे आपचा खरा चेहरा जनतेसमोर आला अशीही टीका काँग्रेसने केली आहे. आप ही भाजपाची बी टीम असल्याचा आरोप अजय माकन यांनी केला आहे.


याच आठवड्यात 1984 च्या शिखविरोधी दंगलीप्रकरणी काँग्रेसचे माजी नेते सज्जन कुमार यांना दिल्ली हायकोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ३१ डिसेंबरपर्यंत त्यांना हजर राहण्याची तंबीही दिली आहे. अशात दिल्ली सरकारने राजीव गांधींचा भारतरत्न पुरस्कार काढून घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.