मुंबई : देशात पूजा खेडकर प्रकरण शांत होतं ना होतं तोच आता इतरही परीक्षांमध्ये तशाच पद्धतीचा घोटाळा होत असल्याचा आरोप केला जातोय. केंद्र सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (CSIR) सेक्शन ऑफिसर आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. CSIR 2023 परीक्षेच्या मुलाखतीची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये कोणतीही पारदर्शकता नसून नावांमध्ये गोंधळ आहे आणि जात प्रवर्गच जाहीर न केल्यामुळे यामध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप होत आहे. तसेच या संस्थेत सध्या कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या मुलांचा आणि नातेवाईकांचाच भरणा असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या संदर्भात काही विद्यार्थांनी CSIR आणि पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रारही केली आहे. 

Continues below advertisement

CSIR CASE परीक्षेसाठी 2023 मध्ये सेक्शन ऑफिसर आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसरच्या 444 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यासाठी या वर्षी फेब्रुवारीमध्ये टीअर 1 परीक्षा पार पडली. ही परीक्षा 350 गुणांची वैकल्पिक स्वरूपाची होती. तर टीअर 2 परीक्षा ही वर्णनात्मक असून ती 150 गुणांसाठी जुलै महिन्यात घेण्यात आली. आता त्याचा निकाल लागला असून 100 गुणांची मुलाखत घेण्यात येणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया CSIR संस्थेकडूनच घेण्यात येत आहे. 

CSIR परीक्षेमध्ये मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी हे CSIR मध्ये सध्या कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचीच मुले आणि नातेवाईक असल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला. त्यामुळे या परीक्षेच्या पारदर्शकतेवर सवाल उपस्थित होत आहे. या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याने पंतप्रधान कार्यालयाच्या अख्यत्यारित असलेल्या या संस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला.

Continues below advertisement

विद्यार्थ्यांचा आरोप काय आहे? 

- ज्या विद्यार्थ्यांनी टिअर 1 परीक्षेमध्ये 350 पैकी 290 हून अधिक गुण मिळवले आहे त्या विद्यार्थ्यांना 150 गुणांच्या वर्णनात्मक परीक्षेमध्ये मात्र 35 टक्केही गुण मिळाले नाहीत. 

- त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी या आधी यूपीएससी आणि इतर केंद्रीय सेवांच्या परीक्षेमध्ये 50 टक्क्यांहून अधिक गुण मिळवल्याचा इतिहास आहे. पण तरीही त्यांना 35 टक्केही गुण मिळाले नाहीत.

- UPSC परीक्षेमध्ये मुलाखतीपर्यंत पोहोचलेल्या अनेक विद्यार्थ्यांना ही परीक्षा उत्तीर्ण होणं शक्य झालं नाही. तर दुसरीकडे CSIR मध्ये कार्यरत असलेल्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांची मुले मात्र यामध्ये सहजपणे पात्र ठरल्याचा आरोप आहे. 

- मुलाखतीमध्ये जे विद्यार्थी पात्र ठरले आहेत त्यांचे गुण जाहीर करण्यात आले नाहीत. त्यामुळे या परीक्षेमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.

- तसेच टिअर 1 आणि टिअर 2 परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची नावं ही पूर्ण छापण्यात आली होती. तर मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या अनेक विद्यार्थ्यांची आडनावे ही छापण्यात आली नाहीत. 

- भरतीमध्ये झालेला भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार लपविण्यासाठी उमेदवारांची आडनावे त्यांच्या संबंधित श्रेणींसह गहाळ असल्याचा आरोप आहे. नेमका हाच प्रकार पूजा खेडकर प्रकरणात या आधी झाला होता. 

- त्याचपद्धतीने मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा जात प्रवर्गही (OBC, ST, SC, PH) जाहीर करण्यात आला नाही. म्हणजे आरक्षणाप्रमाणे विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे की नाही याबद्दल कोणतीही पारदर्शकता नाही. 

- CSIR मध्ये काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांच्या मुलांचा या मुलाखतीच्या यादीमध्ये समावेश आहे. त्यांच्या नावांची यादीसह अनेकांनी CSIR आणि पंतप्रधान कार्यालयाकडे याची तक्रारही केली आहे.

- या प्रकरणी पंतप्रधान कार्यालयाने यामध्ये लक्ष घालण्याची गरज असून परीक्षा प्रक्रियेची सखोल चौकशी करावी, भरती प्रक्रियेच्या निष्पक्षतेतील गंभीर त्रुटींकडे लक्ष द्यावं अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी केली आहे.