Coronavirus Lockdown : कोरोना विषाणूचं वाढतं संकट पाहता, देशातील अनेक राज्यांमध्ये सक्तीचा लॉकडाऊन आणि संचारबंदीचे नियम लागू करण्यात आले आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य प्रशासनांकडून या धर्तीवरील निर्णय घेण्यात येत आहेत. रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात 4 लाख 3 हज़ार 738 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली, तर 4,092 रुग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झाला. ही आकडेवारी पुन्हा एकदा सर्वांनाच धडकी भरवून गेली. 


 कोरोनाचं हे एकंदर चित्र पाहता, देशात जवळपास बहुतांश भागांमध्ये अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सध्याच्या घडीला केंद्र सरकारनं देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केलेली नसली तरीही, राज्य पातळीवरील टाळेबंदीचे निर्देश पाहता एका अर्थी देश घोषणा होण्यापूर्वीच लॉकडाऊनसदृश्य परिस्थितीच पोहोचला आहे हेच स्पष्ट होत आहे. 


Coronavirus in Mumbai : शाब्बास मुंबई! मागील 45 दिवसांत मुंबईत पहिल्यांदाच रुग्णसंख्या 2500हून कमी 


देशातीव पूर्वोत्तर भागालाही या परिस्थितीचा तडाखा बसला आहे. तर, जम्मू काश्मीरमध्येही परिस्थितीचं गांभीर्य पाहून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात, छत्तीसगढ, पश्चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान या भागांमध्ये कोरोनाचा अधिक प्रसार होताना दिसत असल्यामुळं काही कठोर निर्बंध लागू आहेत. 


खालील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत कोरोना नियमावली लागू... 


उत्तर प्रदेश- 17 मे पर्यंत कोरोना संचारबंदीच्या काळात वाढ


दिल्ली- 19 एप्रिलपासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालावधी 17 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय 


बिहार - 4 मे पासून 15 मे पर्यंत लॉकडाऊनचे निर्देश 


ओडिशा- 5 मे ते 19 मेपर्यंत 14 दिवसांचा लॉकडाऊन 


राजस्थान- मागील काही महिने निर्बंध लागू असतानाही, राज्य शासनानं 10 ते 24 मे पर्यंत लॉकडाऊनचे निर्देश दिले आहेत. 


झारखंड- लॉकडाऊनसदृश्य निर्बंधांमध्ये 13 मे पर्यंत वाढ. 


पंजाब- 15 मे पर्यंत वीकेंड लॉकडाऊन आणि रात्रीची संचारबंदी लागू. 


हरियाणा- 3 मे पासून सात दिवसांचा लॉकडाऊन सुरु. आता याच निर्बंधांमध्ये वाढ करत हे निर्बंध 17 मे पर्यंत लागू असतील. 


चंदीगढ- वीकेंड लॉकडाऊन लागू 


मध्य प्रदेश- 15 मे पर्यंत राज्यात जनता कर्फ्यू लागू. फक्त अत्यावश्यक सेवांनाच परवानगी. 


गुजरात- नाईट कर्फ्यूचे नियम लागू, इतर 36 शहरांमध्ये 12 मे पर्यंत अनेक कठोर निर्बंध लागू. 


महाराष्ट्र- 15 मे पर्यंत राज्यात संचारबंदीचे निर्देश, नाईय कर्फ्यूही लागू. लातूर, अमरावती, सिंधुदुर्ग, अकोला, यवतमाळ या भागांत स्थानिक लॉकडाऊन लागू. 


प. बंगाल- मागील आठवड्यापासून कठोर नियम लागू, विनाकारण प्रवासावर बंदी. 


आसाम- सायंकाळी 6 वाजल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत संचारबंदी लागू. बुधवारी सर्व सार्वजनिक स्थळांवर जाण्यास बंदी. 27 मे पर्यंत नाईट कर्फ्यूचे नियम. 


नागालँड- अंशिक लॉकडाऊनचे नियम 14 मे पर्यंत लागू. 


मिझोरम- 10 ते 17 मे पर्यंत लॉकडाऊन लागू. 


मणिपूर- सात जिल्ह्यांमध्ये 8 ते 17 मे पर्यंत रात्रीच्या संचारबंदीचे नियम लागू. 


सिक्कीम- 16 मे पर्यंत लॉकडाऊनप्रमाणे निर्बंध लागू. 


जम्मू काश्मीर- 17 मे पर्यंत लॉकडाऊनच्या धर्तीवर कठोर नियम लागू. 


उत्तराखंड- रात्रीच्या संचारबंदीसह अनेक नियम पुन्हा लागू. 


हिमाचल प्रदेश-  7 ते 16 मे पर्यंत लॉकडाऊन लागू. 


केरळ- 8 ते 16 मे पर्यंत लॉकडाऊनचे निर्देश.


तामिळनाडू- 10 ते 24 मे पर्यंत लॉकडाऊन. 


पुदुच्चेरी- 10 ते 24 मे पर्यंत लॉकडाऊनचा निर्णय.