Coronavirus Cases Today in India : मोठी दिलासादायक बातमी आहे. देशातील कोरोना संसर्गाचा आलेख सलग दुसऱ्या दिवशी घसरला आहे. देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच शनिवारी 5 हजार 664 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही नवी आकडेवारी जारी केली आहे. त्याआधी देशात शुक्रवारी 5 हजार 747 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 29 रुग्णांचा मृत्यू झाला होता. म्हणजेच तुलनेनं 83 रुग्णांची संख्या घटली आहे. तर देशात शनिवारी दिवसभरात म्हणजेच गेल्या 24 तासांत 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ


एकीकडे देशातील नवीन रुग्णांची संख्या कमी झालेली पाहायला मिळते. मात्र दुसरीकडे देशातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढलेली दिसत आहे. देशात सध्या 47 हजारहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. काल ही संख्या 46 हजारांवर होती. सध्या देशात 47 हजार 922 सक्रिय रुग्ण आहेत. देशात नव्या 35 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब अशी आहे की, देशात चार हजारहून अधिक रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 4 हजार 555 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 


देशात मागील 7 दिवसांत 38 हजार 829 नवीन रुग्ण


गेल्या सात दिवसात देशात 38 हजार 829 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून आजपर्यंत देशात एकूण 4 कोटी 45 लाख 34 हजार 188 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. देशात आतापर्यंत 216 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस देण्यात आले आहेत. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.71 टक्के आहे. तर  देशातील सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.11 टक्के आहे.






मुंबईकरांना दिलासा, 209 कोरोनामुक्त


मुंबईत शनिवारी 146 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आता दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत शनिवारी 209 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,28,068 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98.2 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत एकाही रुग्णाचा कोरोनामुळे झाला नाही.