Coronavirus Cases Today in India : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ झाल्याचं दिसत आहे. कोरोनाबाधितांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच बुधवारी दिवसभरात 10 हजार 725 रुग्णांची नोंद झाली असून 36 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. याआधी मंगळवारी देशात 10 हजार 649 रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे रुग्णसंख्येत 76 रुग्णांची वाढ झाल्याचं दिसून येत आहे. कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत आहे. दुसरीकडे पावसामुळे स्वाईन फ्लू, डेंग्यू, मलेरिया यांसारखे साथीचे आजारही पसरताना दिसत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागासमोर नवीन आव्हानं उभी राहिली आहेत.


गेल्या 24 तासांत 36 रुग्णांचा मृत्यू


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या नव्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 36 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बुधवारी दिवसभरात नवीन 10 हजार 725 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून 13,084 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. कोरोना महामारी सुरु झाल्यास आतापर्यंत 4 कोटी 37 लाख 57 हजार 385 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत 210 कोटी कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. सध्या देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.60 टक्के आहे. कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे, ही दिलासादायक बाब आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 94,047 इतकी झाली आहे.






महाराष्ट्रात बुधवारी 1913 कोरोना रुग्णांची नोंद


आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, राज्यात बुधवारी 1913 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर गेल्या 24 तासांत एकूण 1685 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात पाच कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,28, 603 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.01 टक्के इतकं झालं आहे. 


स्वाईन फ्लूसह डेंग्यू आणि मलेरियाचा वाढता धोका
 
मुंबईमध्ये (Mumbai) एकीकडे कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव थांबताना दिसत नाहीय, तर दुसरीकडे स्वाईन फ्लू (Swine Flu), डेंग्यू (Dengue) आणि मलेरियासारखे (Malaria) रोगही हातपाय पसरताना दिसत आहे. पावसामुळे मुंबईत डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यातच आता मुंबईत स्वाईन फ्लूचा धोकाही वाढताना दिसत आहे. मुंबईमध्ये स्वाईन फ्लू, डेंग्यू आणि मलेरिया आणि लेप्टो या सारख्या आजारांमुळे आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे.