Coronavirus India Cases : देशात कोरोना संसर्गाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु, देशात कोरोना रुग्णांच्या मृत्यूंचा आकडा हा वाढताना दिसत आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा तीन लाखांच्या पार पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 222,315 नव्या कोरोनाबाधितांचा नोंद करण्यात आली आहे. तर 4454 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 3,02,544 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. म्हणजेच, 84,683 अॅक्टिव रुग्ण कमी झाले आहेत. यापूर्वी शनिवारी 2.40 लाख नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तर 3741 रुग्णांचा मृत्यू झाला होता. 


23 मेपर्यंत देशभरात 19 कोटी 60 लाख 51 हजार 962 कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 9 लाख 42 हजार 722 लसीचे डोस देण्यात आले होते. तर आतापर्यंत 33 कोटी 5 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 19.28 लाख कोरोना सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 12 टक्क्यांहून अधिक आहे. 


देशातील आजची कोरोना स्थिती


एकूण कोरोना रुग्ण : दोन कोटी 67 लाख 52 हजार 447 
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 37 लाख 28 हजार 
एकूण सक्रिय रुग्ण : 27 लाख 20 हजार 716
एकूण मृत्यू : 3 लाख 3 हजार 720


देशात कोरोनाचा मृत्यूदर 1.13 टक्के आहे. तर रिकव्हरी रेट 88 टक्क्यांहून अधिक आहे. सक्रिय रुग्णसंख्येत घट होऊन 11 टक्क्यांहून कमी आली आहे. कोरोना सक्रिय रुग्णांच्या संख्येत जगभरात भारत दुसऱ्या स्थानी आहे. एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येतही भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर जगभरात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत. 


राज्यात रविवारी 29,177 रुग्णांना डिस्चार्ज, 26,672 नवीन कोरोना रुग्णांची नोंद


महाराष्ट्रात रविवारी  29,177 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 26,672 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दुर्दैवाने काल 594 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  मागील काही दिवसांपासून घातलेल्या निर्बंधांचा चांगलाच परिणाम झाल्याचं समोर येत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे दैनंदिन आकडे कमी होत आहे.  दैनंदिन आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे.   


आजपर्यंत एकूण 51,40,272 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.12% एवढे झाले आहे. राज्यात आज 594 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.  सध्या राज्यातील मृत्यूदर 1.59% एवढा आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,30,13,516 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 55,79,897 (16.9 टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत.  सध्या राज्यात 26,96,306 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 21,771 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण 3,48,395  ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. 


'या' जिल्ह्यांमध्ये 10 हजारांहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण


मुंबई-ठाण्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर आणि नाशिक तसंच विदर्भातील नागपूर एवढ्याच जिल्ह्यात आता उपचार घेत असलेल्या म्हणजे ॲक्टिव्ह कोरोनाबाधितांची संख्या दहा हजारांपेक्षा जास्त आहे. यामध्ये मुंबईत 28284 आणि ठाण्यात 24894 सक्रिय रुग्ण आहेत तर पुण्यात 51182 सक्रिय रुग्ण आहेत. साताऱ्यात  18336 तर सांगलीत 12211 आणि कोल्हापुरात 14919 आणि सोलापुरात 18487 तर नाशिकमध्ये 15946 आणि अहमदनगरमध्ये 16903 उपचार घेत असलेले रुग्ण आहेत. विदर्भात नागपूरमध्ये कोरोनावर 17635 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.


बाकी उर्वरीत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या दहा हजारांच्या आत आहे. सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे तर मराठवाड्यात लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी आणि विदर्भात वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या तर पाच हजारांच्या आत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :