नवी दिल्ली : कोरोना संकटात परदेशात अडकलेले भारतीय मायदेशी परतले आहेत. एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाने 182 भारतीय कोची विमानतळावर पोहोचली आहेत. वंदे भारत मिशन अंतर्गत दुबई विमानतळावरून पहिलं विमान काल (गुरुवारी) संध्याकाळी रवाना झालं असून रात्री उशीरा कोची विमानतळावर दाखल झालं आहे. 182 लोकांमध्ये 5 लहान मुलांचाही समावेश आहे. परदेशातून परतलेल्या भारतीयांसाठी विमानतळावर अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विमानतळावर सॅनिटायजेशन करण्यात आलं आहे. येणाऱ्या लोकांचं थर्मल स्क्रिनिंगही करण्यात येणार आहे.


एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, पाच लहान बाळं आणि 177 प्रौढ प्रवाशांना घेऊन एक विमान रात्री 10 वाजून 9 मिनिटांनी कोची आंतराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आलं. त्यांनी सांगितलं की, एवढ्याच प्रवाशांसह आणखी एक विमान 10 वाजून 32 मिनिटांनी दुबईहून कोझिकोड येथे पोहोचलं आहे.


जवळपास एक आठवड्यांपर्यंत चालणाऱ्या या अभियानामध्ये सध्या 64 उड्डानं आणि काही नौदलाच्या युद्धनौकांमार्फत परदेशातील भारतीयांना मायदेशी घेऊन येणार आहेत. एका आठवड्यात 64 उड्डानांमार्फत देशातील 14.5 हजारांहून अधिक भारतीय घरी परतणार आहेत. सर्वात जास्त 15 फ्लाइट्स केरळमध्ये जाणार आहेत. तर दिल्ली-एनसीआर आणि तमिळनाडूसाठी प्रत्येकी 11, तेलंगाणा 7 आणि गुजरातमध्ये 5 फ्लाइट्स पाठवण्यात येणार आहेत.


गृह मंत्रालयाने सांगितले की, परदेशात विमानाच्या उड्डानाआधी प्रवाशांचं मेडिकल स्क्रिनिंग केलं जाणार आहे. ज्या भारतीयांमध्ये खोकला, ताप आणि सर्दीची लक्षणं असतील. त्यांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार नाही. तसेच भारतात आल्यानंतर या लोकांना 14 दिवसांसाठी रूग्णालयात किंवा इतर ठिकाणी क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे.


मालदीव मार्गे परतणार भारतीय


परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी वंदे भारत मिशन सुरु करण्यात आलं आहे. अशातच मालदीवमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. त्यासाठी ऑपरेशन समुद्र सेतूच्या नावाने दोन नौदलातील युद्धनौका पाठवण्यात आल्या आहेत.


पहिल्या टप्प्यात INS जलाश्वतून जवळपास 750 भारतीय नागरिकांना भारतात आणण्यात येणार आहे. जवळपास 900 किमीचा प्रवास करून हे जहाज कोची बंदरात दाखल होणार आहे. येथे या नागरिकांना उतरवल्यानंतर त्यांच्या राज्यांतील जिल्ह्यांत पोहोचवण्यात येणार आहे.


या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी 40 डॉलर म्हणजेच, जवळपास 3 हजार 26 रुपयांचं सेवा शुल्क आकारण्यात आलं आहे. 40 डॉलर प्रवास शुल्क न म्हणता, सेवा शुल्क म्हणण्याचं कारण म्हणजे, इतर वेळी मालदीव वरून कोचीला येण्याऱ्या लग्जरी क्रूज शिप्स सरासरी 32 हजार रुपयांचं प्रवास शुल्क आकारण्यात येतं.