Corona Update Today : जीवघेण्या कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावानंतर भारतात आता परिस्थिती सुधारताना दिसत आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोना बाधितांच्या दैनंदिन संख्येत घट झाल्याचं दिसून आलं. सलग तिसऱ्या दिवशी 50 हजारांहून कमी दैनंदिन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 45,951 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 817 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी सोमवारी 46,148 आणि मंगळवारी 37,566 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तसेच गेल्या 24 तासांत 60,729 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 


देशातील आजची कोरोना स्थिती


एकूण कोरोनाबाधित : तीन कोटी 3 लाख 62 हजार 484
कोरोनामुक्त रुग्णांचा एकूण आकडा : दोन कोटी 94 लाख 27 हजार 330
एकूण सक्रिय रुग्ण :  5 लाख 37 हजार 
एकूण मृत्यू : 3 लाख 98 हजार 454


देशात सलग 48व्या दिवशी कोरोनामुक्तांचा आकडा अधिक आहे. 29 जूनपर्यंत देशभरात 33 कोटी 28 लाख कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 36.51 लाख लसींचे डोस देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत 41 कोटी कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात जवळपास 19 लाख कोरोना सॅम्पल टेस्ट करण्यात आले आहेत. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्क्यांहून अधिक आहे. 


राज्यात काल (मंगळवारी) 8,085 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 231 जणांचा मृत्यू


राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी रुग्णसंख्या वाढली आहे. राज्यात आज 8,085 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8 हजार 623 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 58 लाख 9 हजार 548 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. सध्या राज्यात 1 लाख 17 हजार 098 अॅक्टिव रुग्ण आहेत. 


राज्यात काल 231 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.01 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 13 लाख  98 हजार 501 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60 लाख 51 हजार 633 (14.62 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 21 हजार 836 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 3 हजार 584 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांपैकी यवतमाळमध्ये सर्वात कमी 89 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 16 हजार 467 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे एकूण 35 जिल्हे आणि महापालिका क्षेत्रात एकही मृत्यूची नोंद नाही. तर नांदेड जिल्हात आज एकाही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नाही. 


मुंबई आज 562 रुग्णांची नोंद, तर 12 रुग्णांचा मृत्यू


मुंबईत गेल्या 24 तासात 562 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 629 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 6 लाख 95 हजार 425 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 8371 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 721 दिवसांवर गेला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :