India COVID-19 Cases : भारतात पुन्हा एकदा दोन हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची (Corona Patients) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 2323 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 25 बाधितांनी आपला जीव गमावला आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे गेल्या 24 तासांत 2346 रूग्ण कोरोनापासून बरेही झाले आहेत. कोरोनाचे सक्रिय रुग्ण 15 हजारांहून कमी झाले आहेत.


आतापर्यंत 5 लाख 24 हजार 348 लोकांचा मृत्यू
कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण चार कोटी 31 लाख 34 हजार 145 जणांना लागण झाली आहे. त्यापैकी 5 लाख 24 हजार 348 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 94 हजार लोक बरे झाले आहेत. देशात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 14996 आहे. म्हणजेच अजूनही अनेक जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


कोरोनाची एकूण रुग्णसंख्या - चार कोटी 31 लाख 34 हजार 145
एकूण डिस्चार्ज - 4 कोटी 25 लाख 94 हजार 801
एकूण सक्रिय रुग्णसंख्या - 14 हजार 996
एकूण मृत्यू - 5 लाख 24 हजार 348
एकूण लसीकरण - 192 कोटी 12 लाख 96 हजार डोस देण्यात आले


देशभरात कोरोना लसीचे 192 कोटी 12 लाख 96 हजार डोस


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, 20 मे 2022 पर्यंत देशभरात कोरोना लसीचे 192 कोटी 12 लाख 96 हजार डोस देण्यात आले आहेत. शेवटच्या दिवशी 15.32 लाख लसीकरण करण्यात आले. त्याच वेळी, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नुसार, आतापर्यंत सुमारे 84.63 कोटी कोरोना चाचण्या झाल्या आहेत. शेवटच्या दिवशी 4.99 लाख कोरोना सॅम्पल टेस्ट करण्यात आल्या.


अ‍ॅक्टिव्ह केसेसच्या बाबतीत भारत 58 व्या स्थानावर


देशात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण 1.22 टक्के आहे, तर बरे होण्याचे प्रमाण 98.75 टक्के आहे. सक्रिय प्रकरणे 0.03 टक्के आहेत. कोरोना अ‍ॅक्टिव्ह केसेसच्या बाबतीत भारत आता जगात 58 व्या स्थानावर आहे. एकूण संक्रमित रुग्णसंख्येच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारतात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.


महाराष्ट्रात वाढतेय रुग्णसंख्या


राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. काल (शुक्रवारी) राज्यामध्ये 311 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासामध्ये एकूण 270 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गुरूवारी राज्यामध्ये 316 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, राज्यात शुक्रवारी एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नाही. राज्यातील मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका आहे. तर राज्यात आतापर्यंत 77,32, 552 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.10 टक्के इतके झाले आहे.