नवी दिल्ली : राम मंदिर आयोध्येमध्येच होणार, मात्र फक्त राजकारण त्याला आडवं येतं आहे, असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला आहे. पुणे एमआयटीने दिल्लीत गुलाबराव महाराजांच्या जन्मशताब्दीनिमित्त साहित्य संमेलन आयोजित केलं होतं. यावेळी मोहन भागवत यांनी उपस्थितांसमोर हे वक्तव्य केलं.


 

"हिंदू-मुस्लिमांमधील कलह धार्मिक कारणांमुळे होऊच शकत नाहीत, ते होतात केवळ राजकारणामुळे.", असेही यावेळी मोहन भागवत म्हणाले. शिवाय, राजकारण केल्यामुळेच राम मंदिर होऊ शकलेलं नाही, असा दावाही भागवत यांनी केला.

 

या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर रामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष रामविलास वेदांती आणि आचार्य धर्मेंद्रजी महाराजही उपस्थित होते.

 

या संमेलनात राम मंदिरासंबंधित एकूण नऊ प्रस्ताव पारित झाले. त्यातील एक म्हणजे अयोध्येत विश्वधर्मी श्रीराम मानवता भवन उभारणे.

 

आपल्या भाषणात रामविलास वेदांती आणि आचार्य धर्मेंद्रजी महराज या दोन संतांनी राम मंदिरावर कडक भूमिका घेण्याचं म्हटलं. 'मानवता भवन' ऐवजी अयोध्येत राम मंदिरच व्हायला पाहिजे, असं हे दोन्ही संत म्हणाले.

 

त्यानंतर साहित्य संमेलनाच्या समारोपात 'मानवता भवन' उभारण्याचा प्रस्ताव सोडून इतर सर्व प्रस्ताव मान्य असल्याचं मोहन भागवतांनी म्हटलं.