नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने सत्ता राखण्यात यश मिळवलं आहे. मात्र पक्षासाठी चिंता वाढवणारी बाब म्हणजे 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतांची टक्केवारी घसरली आहे. भाजपने 2014 ला 60 टक्के मतं मिळवली होती, तर यावेळी विधानसभा निवडणुकीत 49.1 टक्के मतं मिळाली आहेत.


काँग्रेसनेही 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत जवळपास 10 टक्के मतं जास्त मिळवली आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही मतं काँग्रेसला पुरेशी नाहीत. 2014 साली काँग्रेसने 33 टक्के मतं मिळवली होती, हा आकडा आता 41.4 टक्क्यांवर गेला आहे.

2012 विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजप, काँग्रेसच्या मतांमध्ये वाढ

दुसरीकडे 2012 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेस आणि भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली आहे. 2012 साली भाजपला 48 टक्के मतं मिळाली होती, तर यंदा हा आकडा 49.1 टक्क्यावर गेला आहे. शिवाय काँग्रेसला 2012 साली 39 टक्के मतं मिळाली होती, तो आकडा आता 41.4 टक्क्यांवर गेला आहे.

भाजप आणि काँग्रेस यांच्यातील मतांच्या टक्केवारीत जवळपास 7.7 टक्क्यांचा फरक आहे. 2007 च्या निवडणुकीनंतर पश्चिम गुजरातच्या मतांमध्ये मोठा फरक पाहायला मिळाला आहे. 2007 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मतांची टक्केवारी 49.12 टक्के, तर काँग्रेसच्या मतांची टक्केवारी 39.63 टक्के होती. म्हणजेच दोन्ही पक्षांच्या मतांच्या टक्केवारीत 9.49 टक्क्यांचा फरक होता, जो 2012 सालच्या विधानसभा निवडणुकीत 9 टक्क्यांवर आला.

दरम्यान, 2002 सालच्या दंगलीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस यांच्यात 10.4 टक्क्यांचा फरक होता. मात्र इथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 60 टक्के मतं घेत सर्व जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता. मात्र यावेळी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मतांमध्ये वाढ झाली आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीत इतर पक्ष आणि अपक्षांनी मिळून 4.3 टक्के मतं मिळवली आहेत. तर 1.08 टक्के मतदारांना नोटाचा पर्याय निवडला.