लखनौ : उत्तरप्रदेशात सपा-बसपानं हातमिळवणी केल्यानंतर एकट्या पडलेल्या काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला आहे. उत्तर प्रदेशातील सर्वच्या सर्व 80 मतदारसंघात आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू आणि या निवडणुकीचा निकाल आश्चर्यचकीत करणारा असेल, असं काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे.


आम्हाला महाआघाडी करायची होती. मात्र त्यांना आमची साथ नको होती. त्यामुळे आम्ही पूर्ण तयारी केली असून भाजपाला हरवण्यासाठी जो पक्ष आमच्या सोबत येईल, त्याचं आम्ही स्वागतच करू, असं म्हणत आझाद यांनी काँग्रेस इतर पक्षांसाठी हातमिळवणी करण्यास तयार असल्याचे संकेत दिले आहेत.

संसदेत काँग्रेस आणि भाजपामध्ये लढाई आहे हे सर्वश्रुत आहे. ज्यांना आमची मदत करायची असेल त्या पक्षांची मदत आम्ही नक्कीच घेऊ. या लढाईत आमची मदत करणाऱ्या सगळ्यांचा आम्ही सन्मान करतो, असंही आझाद म्हणाले.

भाजपला हरविण्यासाठी जे पक्ष लढत आहेत त्या सर्वांशी आम्ही युती करायला तयार होतो मात्र सपा बसपाने त्यांचे मार्ग वेगळे केले. त्यांनी युती तोडली. त्यामुळे आता तो विषय संपला. आम्ही कुणाला जबरदस्ती नाही करू शकत त्यामुळे आता आम्ही एकटेच लढणार. आम्ही संपूर्ण तयारीनिशी निवडणुकीत उतरणार. 2009 मध्ये जसा काँग्रेस उत्तर प्रदेशमध्ये 1 नंबरचा पक्ष ठरला होता तसेच आताही आम्ही एकटे लढू व त्यावेळी जिंकलेल्या त्यापेक्षा दुप्पट जागांवर निवडून येऊ, असेही यावेळी आझाद यांनी यावेळी सांगितले.

सपा-बसपा आघाडीची घोषणा, 38-38 जागांवर लढणार
गेल्या वर्षभरापासून देशाचं लक्ष लागलेली बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी नुकतेच पत्रकार परिषद घेऊन बसपा आणि सपाच्या आघाडीची घोषणा केली आणि जागावाटपही जाहीर केलं आहे.

या पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधत या आघाडीत सपा- बसपाने काँग्रेसला स्थान दिलेले नाही. उत्तर प्रदेशात बसपा आणि सपा 38-38 जागा लढवणार आहेत. मात्र, रायबरेली आणि अमेठी या काँग्रेसच्या पारंपारिक मतदारसंघात उमेदवार उभा करणार नसल्याचं मायावतींनी स्पष्ट केलं आहे. तर उरलेल्या दोन जागा मित्र पक्षांसाठी ठेवल्या आहेत. इतकंच काय तर पंतप्रधानपदासाठीही राहुल गांधीपेक्षा मायावतींना पसंती असल्याचं अखिलेश म्हणाले.

मायावती यांनी काँग्रेसला आघाडीत सहभागी न करण्याबाबत स्पष्टीकरण दिलं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून मोठा काळ देशाची सत्ता काँग्रेसच्या हाती होती. काँग्रेसच्या काळातही भ्रष्टाचार झाला, गरिबी वाढली, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेसच्या काळातच आणीबाणी लागली. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपची कार्यशैली एकसारखी आहे. बोफोर्स प्रकरणात काँग्रेसने सत्ता गमावाली होती आणि राफेलमुळे भाजप सरकार जाणार, असा घणाघात मायावतींनी केला होता.

एबीपी न्यूजने केलेल्या सर्व्हेनुसार एपी आणि बीएसपी आघाडी झाली तर उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीत त्यांना 50 हून अधिक जागा मिळू शकतात. तर एनडीएला 28 जागांवर यश मिळेल. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अवघ्या दोन जागा मिळाल्या होत्या. उत्तर प्रदेशात एनडीएमध्ये भाजप, अपना दल, सुहेलदेव भारतीय समाज पार्टी यांचा समावेश आहे. मात्र सध्या हे दोन्ही पक्ष भाजपवर नाराज आहेत.