Congress On BJP :  काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लसीकरणाच्या मुद्यावरुन भाजपवर टीका केली आहे. 2021 या वर्षाच्या शेवटपर्यंत सर्वांना लसीचे दोन डोस देऊ, असे आश्वासन केंद्र सरकारने दिले होते. मात्र, आज या वर्षाचा शेवटचा दिवस असून, ते आश्वासन सरकारने पूर्ण केले नाही. असे सांगताना राहुल गांधी यांनी 'देश अब भी वैक्सीन से दूर, एक और जुमला चकनाचूर'! असे ट्वीट करत मोदी सरकारवर निशाणा लगावला आहे.


राहुल गांधी यांनी ट्वीट करत भाजप सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केले नसल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने जूनमध्ये सुप्रीम कोर्टात या वर्षाच्या शेवटी सर्व पात्र नागरिकांनी लसीचे दोन डोस देणार असल्याचे म्हटले होते. मात्र, अद्याप अनेकांना लसीकरण झाले नाही, त्यांना लसीकरणाची अपेक्षा असल्याचे गांधी यांनी म्हटले आहे.


आतापर्यंत 144 कोटींहून अधिक डोस 
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 144 कोटींहून अधिक अँटी-कोरोनाव्हायरस लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल 66 लाख 65 हजार 290 डोस देण्यात आले. दरम्यान, देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. यासोबतच कोरोनाचा धोकादायक प्रकार असलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या (Omicron Variant) रुग्णांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 16 हजार 764 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर, 220 लोकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे 1,270 रुग्ण सापडले आहेत.  देशात आतापर्यंत 1 हजार 270 लोकांना ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे. आतापर्यंत देशातील 23 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये आहेत. यानंतर केरळ तिसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात 450, दिल्लीत 320 आणि केरळमध्ये 109 लोकांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सक्रिय रुग्णांची संख्या 91 हजार 361 झाली आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 81 हजार 80 झाली आहे. आकडेवारीनुसार, काल 7585 रुग्ण बरे झाले होते, त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 42 लाख 66 हजार 363 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.


महत्त्वाच्या बातम्या: