नवी दिल्ली : भीमा-कोरेगाव येथील हिंसाचाराचे पडसाद आज (बुधवार) संसदेतही उमटले. याप्रकरणी लोकसभा आणि राज्यसभेत काँग्रेससह विविध विरोधी पक्षांनी जोरदार घोषणाबाजी केली. दोन्ही सभागृहात काँग्रेसनं या मुद्द्यावर आवाज उठवत चर्चेही मागणी केली.


याचविषयी लोकसभेत बोलताना काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी थेट पंतप्रधान मोदींवरच निशाणा साधला. 'भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी चौकशीसाठी सुप्रीम कोर्टच्या न्यायमूर्तींची नेमणूक करण्यात यावी. तसंच याबाबत पंतप्रधान मोदींनीही यावर आपलं निवदेन सादर करावं. पण ते तसं करत नाहीत. काही ठराविक विषय आल्यास ते मौनीबाबा होतात.' असं म्हणत खर्गे यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.

याचवेळी खर्गेंनी भाजपवरही निशाणा साधला. 'देशातील अनेक ठिकाणी दलितांवर हल्ले होत आहेत. जिथे-जिथे भाजपची सत्ता आहे तिथे असे हिंसक प्रकार सुरु आहेत.' असा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, विरोधकांच्या आरोपांना केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांनी सभागृहात उत्तर दिलं. 'भीमा-कोरेगाव घटनेनंतर काँग्रेस अध्यक्ष या प्रकरणात आणखी तेल ओतण्याचा प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान मोदी हे 'सबका साथ, सबका विकास', हा नारा देऊन काम करत आहे.' असं अनंत कुमार म्हणाले.

संंबंधित बातम्या :

भीमा-कोरेगाव हिंसाचारामागे भाजप आणि संघाचा हात : मायावती

याकूबप्रमाणे संभाजी भिडे, एकबोटेंवर गुन्हे दाखल करा: आंबेडकर

पुण्यात जिग्नेश मेवाणी, उमर खालिदविरोधात पोलिसात तक्रार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं परीक्षा पुढे ढकलल्या

एसटी तुमचीच, कृपया मोडतोड करु नका, परिवहनमंत्र्यांचं आवाहन