नवी दिल्ली : ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यात भाजप आणि काँग्रेसची हातमिळवणी झाल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. दिल्लीत आज याप्रकरणी आम आदमी पक्षानं जोरदार निदर्शनं केली. त्यानंतर जंतर-मंतरवर झालेल्या सभेवेळी त्यांनी भाजप-काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.


 

काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीप्रकरणी गप्प आहे आणि भाजप ऑगस्टा प्रकरणात सोनियांवर कारवाई करत नाही, असा आरोप करत सोनियांना तात्काळ अटक करा, अशी मागणी केजरीवाल यांनी केली आहे.

 

यूपीए-1 च्या काळात भारतानं इटलीकडून हेलिकॉप्टर खरेदी केली होती. मात्र, या व्यवहारात लाच दिली गेल्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी इटलीच्या न्यायालयानं दिला. निकालात न्यायालयानं सोनिया गांधी, मनमोहन सिंह यांचादेखील उल्लेख केला. त्यामुळे हे प्रकरण सध्या चांगलचं गाजतं आहे.

 

काय आहे ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा?


 

भारतीय हवाई दलाने 2010 मध्ये इटलीच्या ऑगस्टा या कंपनीकडून 3600 कोटी रुपयात 12 व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टरची खरेदीचा करार केला. ज्यावेळी हा व्यवहार झाला, त्यावेळी केंद्रात मनमोहन सिंह यांच्या नेतृत्त्वातील यूपीए सरकार होतं. तर हवाई दलाचे प्रमुख एस पी त्यागी होते.

 

या व्यवहारासाठी कमीशनरुपी 10 टक्के म्हणजे सुमारे 350 कोटी रुपये लाच म्हणून देण्यात आली होती, असं सांगण्यात येतं.

 

या व्यवहारात लाचखोरी झाल्याचं 2012 मध्ये समोर आलं. घोटाळ्याच्या गदारोळानंतर 2013 मध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री ए के अँटोनी यांनी भ्रष्टाचार झाल्याचं कबूल करत, हा सौदाच रद्द केला होता. तोपर्यंत तीन हेलिकॉप्टर्स भारतात आले होते.

 

इटलीच्या कोर्टाने या संपूर्ण व्यवहारात 125 कोटी रुपयांची लाचखोरीचा प्रकार घडल्याचा ठपका ठेवला आहे. ऑगस्टा वेस्टलँड आणि ‘फिनमेक्कनिका’ या दोन्ही कंपन्यांच्या प्रमुखांनी लाच दिल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे दोन्ही कंपनीच्या प्रमुखांना साडेचार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

 

इटलीच्या न्यायालयाने याप्रकरणात ऑगस्टा वेस्टलँड कंपनीच्या प्रमुखाला शिक्षा ठोठावल्यामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेला आलं आहे. या कंपनीच्या प्रमुखाने या व्यवहारासाठी भारतात लाच दिल्याचा आरोप आहे.

 

महत्त्वाचं म्हणजे भारतात कोणाला लाच दिली हे अद्याप समोर आलं नसलं तरी कोर्टाने चार वेळा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचं नाव घेतलं आहे.