बडोदा : पुढच्या संमेलनापासून साहित्य संमेलनासाठी देण्यात येणारे अनुदान 50 लाख रुपये करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते बडोद्यात आयोजित 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बोलत होते.


"मराठी भाषा आणि साहित्य सदैवच कालसुसंगत राहिले आहे. एक प्रमुख भाषा म्हणून मराठीकडे जगभर पाहिजे जाते. भाषा हे संवादाचे माध्यम आहे. तिला ज्ञानभाषा म्हणून पुढे आणण्यासाठी आजच्या डिजिटल युगाशी सुसंगत मराठीचा वापर ही काळाची गरज आहे.", असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

मराठीच्या अभिजात दर्जासाठी पंतप्रधानांना भेटणार - मुख्यमंत्री

"मराठीची ताकद मोठी आहे. कुठलेही आव्हान स्वीकारण्याची क्षमता मराठी भाषेत आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राज्य सरकार संपूर्ण प्रयत्न करीत आहे. सर्व साहित्यिकांचे एक शिष्टमंडळ घेऊन आपण लवकरच मा. पंतप्रधान महोदयांना भेटण्यासाठी जाऊ.", असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी संमेलनाच्या व्यासपीठावरुन दिले.

महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरीत होत असलेल्या या संमेलनाला अनेक साहित्यिक, साहित्यरसिक उपस्थित आहेत. शुक्रवारी दुपारी बडोद्यात संमेलनाचे औपचारिक उद्घाटन झाले. संमेलनाच्या पूर्वसंध्येला बडोद्यात ग्रंथदिंडी काढण्यात आली. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात आले. राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड संमेलनाच्या स्वागताध्यक्षा आहेत.

दरम्यान, उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, स्वागताध्यक्षा श्रीमंत राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड, मावळते अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, ज्ञानपीठ विजेते डॉ. रघुवीर चौधरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.