मुंबई : पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो. परंतु आता या बालदिनाची तारीख बदलण्याची मागणी दिल्ली भाजपा अध्यक्ष मनोज तिवारी यांनी केली आहे. दिल्लीतील निवडणुकीच्या हंगामात भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बालदिनाची तारीख बदलण्यासाठी पत्र लिहिले आहे.


खासदार आणि दिल्ली भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी आपल्या पत्राद्वारे लिहिले आहे की, 14 नोव्हेंबर माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. त्याऐवजी शीखांचे दहावे गुरू गुरूगोविंद सिंह साहिबादादा फतेहसिंग यांच्या शहादत दिवस बालदिन म्हणून साजरा केला पाहिजे.
पंडित जवाहरलाल नेहरूंचा 14 नोव्हेंबर रोजी वाढदिवसानिमित्त बालदिन साजरा करण्याची परंपरा 1956 पासून सुरू आहे. त्यामागील संकल्पना अशी आहे की पंडित नेहरूंचे मुलांवर प्रेम होते.

मनोज तिवारी म्हणाले की, मुलांनी आपल्या देशात बळी दिले आहेत आणि त्यापैकी सर्वोत्कृष्ट म्हणजे साहिब गुरु साहिब श्री गुरूगोविद सिंह जी, शीखांचे साहिबजादा झोरबारसिंग जी आणि साहिबजादा फतेहसिंग जी हे 1505 मध्ये सरहिंद पंजाब येथे होते. पौष महिन्यातील कडाक्याच्या थंडीमध्ये फतेहगड साहिबच्या थंड बुर्जावर तीव्र धैर्य दाखवत त्यांनी धर्म रक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले.


या शूर मुलांचा त्याग व धैर्य लक्षात घेऊन त्यांच्या शहीद दिनाला दरवर्षी बालदिन म्हणून साजरा करावा, अशी विनंती मनोज तिवारी यांनी पंतप्रधानांनी लिहिलेल्या पत्रात केली आहे.

भाजपकडून नेहरूंच्या नावाला सातत्याने विरोध होता. तसेच भाजप नेत्यांनी पंडित नेहरूंवर टीका देखील केली आहे. या दरम्यान भाजपनेते मनोज तिवारी यांचे पत्र नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आता काँग्रेसकडून मनोज तिवारी यांच्या पत्रावर काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.