Chandrayaan 3: संपूर्ण देश चांद्रयान-3 मोहिमेच्या यशस्वी सॉफ्ट लँडिंगचा आनंद साजरा करत आहे. या महत्त्वाकांक्षी मोहिमेचं यश हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) शास्त्रज्ञांच्या मेहनतीचं फळ आहे. 23 ऑगस्टला चांद्रयानाने चंद्राच्या भूमीला स्पर्श करताच संपूर्ण भारत आनंदाने भारावला. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून जगभरातील अंतराळ संस्था इस्रोचं अभिनंदन करत आहेत, शास्त्रज्ञांच्या मेहनतीला सलाम करत आहेत. आता याच दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनीही इस्रोचं अभिनंदन केलं, परंतु त्यांच्या एका चुकीमुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या.


एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, चांद्रयान-3 च्या चंद्रावरील सॉफ्ट लँडिंगपूर्वी, ममता बॅनर्जी यांनी एका कार्यक्रमात इस्रोचं अभिनंदन केलं आणि ते यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, 1984 च्या मिशनचा किस्सा सांगताना ममता बॅनर्जींनी अंतराळवीर राकेश शर्मांऐवजी चित्रपट निर्माते राकेश रोशन यांना चांद्रमोहिमेचं संपूर्ण श्रेय दिलं. त्याचं झलं असं की, ममता बॅनर्जी भाषणादरम्यान नावात गोंधळल्या आणि राकेश शर्मांऐवजी त्यांनी राकेश रोशन यांचं नाव घेतलं. या विधानामुळे त्या आता चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.


नक्की काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?


भाषणादरम्यान ममता बॅनर्जी म्हणाल्या, "पश्चिम बंगालच्या लोकांच्या वतीने मी इस्रोचं अभिनंदन करते, याचं श्रेय शास्त्रज्ञांना मिळालं पाहिजे. राकेश रोशन (Rakesh Roshan) जेव्हा चंद्रावर पोहोचले होते, तेव्हा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना बोलावून विचारलं होतं की, तिथून भारत कसा दिसतो?"


राजस्थानचे मंत्री चांद्रयान 3 बद्दल काय म्हणाले?


केवळ ममता बॅनर्जीच नाही तर इतरही नेते आहेत, जे चांद्रयान 3 वरील त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, राजस्थानचे क्रीडा मंत्री अशोक चंदा यांनीही असंच काही विधान केलं आहे. ते म्हणाले, "चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगनंतर ते त्यातील अंतराळवीरांना सलाम करतील, ज्यांच्यामुळे चांद्रयानचं लँडिंग शक्य झालं. चांद्रयानातील सर्व यात्रींना देखील सलाम." राजस्थानचे मंत्री त्यांच्या या वक्तव्यामुळे बरेच ट्रोल झाले, कारण चांद्रयान 3 ही एक मानवरहित मोहीम आहे. त्यात कोणताही अंतराळवीर किंवा यात्री नाही.


राकेश शर्मा हे अंतराळात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर


अंतराळवीर राकेश शर्मा हे सोव्हिएत युनियनच्या सोयुझ T-11 मिशनचा भाग म्हणून 1984 मध्ये अंतराळात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर होते. अंतराळ मोहिमेवर गेलेल्या राकेश शर्मा यांना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बोलावून जेव्हा विचारलं होतं की, तिथून भारत कसा दिसतो? तेव्हा राकेश शर्मा म्हणाले होते – सारे जहाँ से अच्छा.


आता चांद्रयान-3 ने 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करून इतिहास रचला. आजपर्यंत कोणताही देश दक्षिण ध्रुवावर पोहोचलेला नाही, असं करणारा भारत पहिला आणि चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणाऱ्या देशांच्या यादीत चौथा ठरला आहे.


हेही वाचा:


ISRO Scientists Salary: इस्रोच्या वैज्ञानिकांना नेमका किती पगार मिळतो? जाणून घ्या