ISRO Chandrayaan-3 : भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष इस्रो (ISRO) च्या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेकडे लागलं आहे. चांद्रयान-3 चा चंद्राकडे प्रवास सुरु आहे. चांद्रयान-3 पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडलं असून त्याचा चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे. चांद्रयान-3 ने सर्व कक्षा ठरलेल्या वेळेत पूर्ण केल्या असून आता ते चंद्राच्या कक्षेत लवकरत प्रवेश करेल. दरम्यान, चांद्रयान-3 साठी पुढील काही तास फार महत्त्वाचे आहेत. 


...तर चांद्रयान-3 मोहिम होईल अयशस्वी


भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने म्हटले आहे की, चांद्रयान-3 मोहीम या आठवड्याच्या सुरुवातीला पृथ्वी सोडल्यानंतर 5 ऑगस्ट रोजी चंद्राच्या प्रभावाच्या क्षेत्रात प्रवेश करेल. दरम्यान, या मोहिमेचं यश सध्या एका गंभीर टप्प्यावर अवलंबून आहे. जर चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत प्रवेश करू शकलं नाही तर, ही चंद्रमोहिम अयशस्वी ठरेल. त्यामुळे सध्या चांद्रयान-3 मोहिम गंभीर टप्प्यावर आहे. चांद्रायान-3 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यावर ही मोहिम सफल होणार आहे. 


चांद्रयान-3 मोहिम महत्त्वाच्या टप्प्यावर


चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यावर अंतराळ यानाचा वेग कमी होतो, ज्यामुळे चंद्राच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्राला चंद्राच्या स्थिर कक्षेत खेचता येते. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामध्ये शिरण्यास चांद्रयान-3 अयशस्वी झाल्यास त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे चांद्रयान-3 चंद्रावर कोसळू शकते किंवा त्यापासून दूर फेकले जाऊ शकते. त्यामुळे चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणं फार महत्त्वाचं आहे.


चांद्रयान -3 चा चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु


इस्त्रोने सांगितल्याप्रमाणे, चांद्रयान -3 ने पृथ्वीच्या कक्षेतील सर्व फेऱ्या यशस्वीरित्या पूर्ण करत चंद्राच्या दिशेने प्रवास सरु केला आहे. तसेच जर यामधील सर्व प्रक्रिया या ठरलेल्या वेळेत अपेक्षे प्रमाणे पार पडल्या तर चांद्रयान-3 5 ऑगस्ट 2023 पर्यंत चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणं अपेक्षित आहे. इस्रोने 31 जुलै 2023 रोजी ट्वीट करत चांद्रयानाविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे. इस्रोने ट्वीटमध्ये की, चांद्रयान -3 ला पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडण्यासाठी  निर्धारित वेळेत त्याचे इंजिन चालू करण्यात आले. त्यानंतर या यानाला पुरेसा वेग देऊन त्याला चंद्राच्या दिशेने पाठवण्यात आले आहे. 


चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर कधी उतरणार?


चांद्रयान-3 मोहिमेद्वारे भारताची चंद्रावर उतरण्याची योजना आहे. चांद्रयान-3 यशस्वी झाल्यास चंद्रावर उतरणारा भारत चौथा देश ठरेल. तर, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार पहिला देश ठरेल. चंद्राचा दक्षिण ध्रुव अधिक काळ अंधारात असतो. या भागात पाण्याची साठे शोधण्याचाही या मोहिमेमागचा एक हेतू आहे. 14 जुलैला चांद्रयान-3 चं यशस्वी प्रक्षेपण झालं. चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी माहिती देताना सांगितलं की, "जर सर्व काही ठीक पार पडलं तर चांद्रयान 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.47 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल." 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Chandrayaan-3 : ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळले चांद्रयान-3 चे अवशेष? रहस्यमयी वस्तूचं गूढ काय?