अमरावती : लोकसभेत तेलुगू देसम पक्षाने (टीडीपी) आणलेला अविश्वास ठराव पडल्यानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायुडू यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. पंतप्रधान हे अहंकारी असल्याचं म्हणत त्यांनी आंध्र प्रदेशच्या जनतेचा अपमान केल्याचं चंद्राबाबूंनी म्हटलं आहे.


अविश्वास ठराव पडल्यानंतर चंद्राबाबूंनी आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीमध्ये सचिवालयात पत्रकार परिषद घेतली. आंध्र प्रदेशवर केंद्र सरकारवर अन्याय केला असल्याचं ते म्हणाले.

आंध्र प्रदेशला दिलेल्या आश्वासनांना न्याय देण्यात आला नाही. राज्याचं 2014 मध्ये विभाजन झाल्यानंतर मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला आहे, असं चंद्राबाबू म्हणाले.

आंध्र प्रदेशच्या पाच कोटी लोकांना आशा होती की केंद्र सरकारला पश्चात्ताप होईल आणि चूक सुधारतील. पंतप्रधान अहंकारी आहेत. त्यांना सत्तेचा अहंकार आहे, असं म्हणत चंद्राबाबूंनी मोदींवर टीका केली.

अविश्वास ठरावात मोदी सरकारचा विजय

मोदी सरकारविरोधातला पहिला अविश्वास ठराव लोकसभेत पडला. सरकारच्या बाजूने 325 मतं पडली, तर विरोधकांच्या बाजूने केवळ 126 सदस्य होते. एकूण 451 सदस्यांनी या मतदानात भाग घेतला. बीजेडी आणि शिवसेनेने मतदानाला गैरहजेरी लावली.