नवी दिल्ली : लोकांनी काय खायचं आणि काय नाही, यावर केंद्र सरकार कोणतेही बंधनं आणणार नाही, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे.


केंद्र सरकारने जनावरांच्या विक्रीवर बंदी घातल्याने मिझोराममध्ये सुरु असलेल्या एका विरोध प्रदर्शनावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राजनाथ सिंह यांनी ही माहिती दिली. लोकांच्या खाण्यापिण्यावर कोणतंही बंधन नसावं, असं त्यांनी सांगितलं.

राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वेकडील चार राज्यातील मंत्र्यांची बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. परराष्ट्र मंत्रालय मिझोराम आणि म्यानमार दरम्यान मुक्त वाहतुकीसाठी नवीन धोरण तयार करत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

केंद्र सरकारने जनावरांच्या विक्रीवर बंदी घातल्याने मिझोराममध्ये विरोध वाढला आहे. राजनाथ सिंह मिझोराम दौऱ्यावर असतानाही विरोध प्रदर्शनं करण्यात आली.