मुंबई : चिटफंड घोटाळ्याप्रकरणी तुरूंगाची हवा खाणाऱ्या मोतेवार दाम्पत्याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कारण मोतेवारांच्या समृद्ध जीवनविरोधात सीबीआयने कारवाईचा धडाका लावला आहे.


महाराष्ट्रासह देशभरातील समृद्ध जीवनची कार्यालयं सीबीआयकडून सील करण्यात येत आहेत. शेकडो कोटींचा चिटफंड घोटाळा केल्याचा महेश मोतेवारांवर आरोप आहे.

समृद्ध जीवनची महाराष्ट्रासह देशात अनेक कार्यालयं आहेत. सीबीआयने ही सर्व कार्यालयं सील करण्याची कारवाई सुरु केली आहे.

फसवणुकीच्या गुन्ह्यात महेश मोतेवार यांना CRPC 299 प्रमाणे फरार घोषित करण्यात आलं होतं. महेश मोतेवार महाराष्ट्र पोलिसांना गेल्या 3 वर्षांपासून सापडले नव्हते.

उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरुम पोलिस ठाण्यात 420 , 448 , 427 , 491 34 कलमांअंतर्गत मोतेवारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. डेअरी प्रकल्पामध्ये भागीदारी देण्याचे अमीष दाखवून 35 लाख रुपयांना फसवल्याप्रकरणी 2012 मध्ये उमरगा कोर्टाच्या आदेशाने गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिसांनी कोर्टात 2013 साली आरोपपत्र दाखल करताना मोतेवार यांना फरार घोषित केलं होतं.

काय आहे प्रकरण ?

शिवचंद्र रेवते आणि सांगलीचे तात्यासाहेब शिवगौंडा यांच्या भागीदारीत येनेगूर येथे रेवते अॅग्रो कंपनी होती. त्यात पुढे या भागीदारीत फूट पडली. त्यामुळे कंपनी वादात अडकली, अशा वादात रेवते यांनी तात्यासाहेब शिवगौंडा यांची फसवणूक करत सदर कंपनी महेश मोतेवार यांना 85 लाखात विक्री केली.

त्यामुळे शिवगौंडा यांनी रेवते यांच्यासह मोतेवार विरोधात उमरगा न्यायालयात तक्रार दाखल केली होती. फेब्रुवारी 2010 मध्ये गुन्हा नोंदवला गेला, यात महेश मोतेवार हे सह आरोपी आहेत. मात्र, या प्रकरणात महेश मोतेवार हजर झाले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी मोतेवारांना फरार घोषित केलं होतं.