पंढरपूर : जम्मू काश्मीरच्या नगरोटामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पंढरपूरचे रहिवासी असलेले मेजर कुणाल मुन्नागिर गोसावी शहीद झाले आहेत. पहाटे साडेपाच वाजता दहशतवाद्यांशी लढताना गोसावी यांना वीरमरण आलं.


32 वर्षांचे कुणाल गोसावी नऊ वर्षांपूर्वीच सैन्यात दाखल झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी उमा, मुलगी आणि दोन भाऊ आहेत.

जम्मू काश्मीरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दहशतवाद्यांशी चकमक सुरु आहे. सीमेवर घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय जवान टिपून मारत आहेत. मात्र पोलिसांच्या वेशात शिरलेल्या काही दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एका अधिकाऱ्यासह तीन जवान शहीद झाले.

अतिरेकी हल्ल्यात नांदेडचा जवान धारातीर्थी


जवानांच्या प्रत्युत्तरात चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आल्याची माहिती आहे. मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील जानापुरी गावचे रहिवासी असलेले लान्स नायक संभाजी यशवंत कदमही या हल्ल्यात धारातीर्थी पडले. 35 वर्षीय कदम यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि 3 वर्षांची मुलगी आहे. शिपाई रघविंदरही या हल्ल्यात शहीद झाले आहेत.